शनिवार, ३१ मार्च, २०१२

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळणार एसटीचे स्मार्ट कार्ड



            मुंबई, दि. 30 :  राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना येत्या दोन महिन्यात एसटीचे स्मार्टकार्ड देण्यात येईल असे  परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज मंत्रालयात सांगितले.
            मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) साध्या  व निमआराम बसेसमधून विनामूल्य प्रवासासाठी वार्षिक पासेसचे वितरण मंत्रालयातील पत्रकार कक्षात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांना आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक प्रमोद नलावडे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विलास मुकादम यांना एसटीचे वार्षिक पासेस देण्यात आले.
            याप्रसंगी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद  धस तसेच पत्रकार  मोठया संख्येने उपस्थित होते.
            श्री. गुलाबराव देवकर पुढे म्हणाले की, पत्रकारांना स्मार्ट कार्ड देताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक  त्या सूचना देण्यात येतील.
            मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी राज्यमंत्री देवकर , महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. कपूर व महासंचालक श्री. नलावडे यांचे  स्वागत  करुन  सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.  कार्यवाह संजीव शिवडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
0 0 0 0

मराठी तारका सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मराठी चित्रपट तारका झळकल्या एकाच मंचावर


          मुंबई, दि. 30 : मराठी बोलपटाला 80 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त निर्माता-दिग्दर्शक  महेश  टिळेकर यांनी काल रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी येथे मराठी अभिनेत्रीच्या नृत्यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम  `मराठी तारका` सादर केला.
          यावेळी  सांस्कृतिक  कार्यमंत्री  संजय देवतळे, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, हिंदी अभिनेत्री हेलन, झीनत अमान, रती अग्निहोत्री, वर्षा उसगावकर, अभिनेता संजय नार्वेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
          आपल्या सौदर्याने रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रख्यात मराठी अभिनेत्रींनी लावणी, लोककला, नृत्य कला प्रकार या कार्यक्रमात सादर केले. सुधा चंद्रन, रेशम टिपणीस, शर्वरी जमेनीस,  क्रांती रेडकर, दिती भागवत,  नूतन जयंत, मेधा घाडगे, भार्गवी चिरमुले, किशोरी गोडबोले, स्मिता शेवाळे, मानसी नाईक, पूजा सावंत, प्रिया बापट, तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, तेजा देवकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी यात भाग घेतला होता.  
          तसेच विनोदी कलाकार विजू खोटे, किशोरी अंबिये, दिगंबर नाईक, संदिप पाठक, दिपक देशपांडे यांनी देखील विनोदी कार्यक्रम सादर केले.
          या कार्यक्रमाचे  आयोजन निर्माता- दिग्दर्शक  महेश टिळेकर  यांनी केले होते. तर नृत्यदिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले होते.
000

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात 2 एप्रिल 2012 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


          मुंबई, दि.30 : नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा जलदगतीने व्हावा, त्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस,शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई, येथे सोमवार दिनांक 2 एप्रिल 2012 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी, नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
          मुंबई शहर जिल्ह्याच्या शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी सदर दिवशी उपस्थित राहून तीन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने लोकशाही दिनी स्वीकारली जाणार नाहीत. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. सेवा व आस्थापना विषयक तक्रारी, विविध न्यायालये, प्राधिकरण, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी (उदा.राजस्व, अपिल्स इ.) स्वीकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.
000

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे मंगळवारी विधानभवनात व्याख्यान


मुंबई, दि. 30 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त `यशवंतराव महाराष्ट्रातले, यशवंतराव दिल्लीतले` या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे            मंगळवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधानभवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
          मधुकर भावे लिखित `महाराष्ट्र : काल, आज आणि उद्या` या पुस्तकाचे प्रकाशन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  
000

महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, वाहतूक क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांना सहभागाची मोठी संधी : मुख्यमंत्री अमेरिकेचे वाणिज्यमंत्री जॉन ब्रायसन - मुख्यमंत्री यांच्यात चर्चा


मुंबई, दि. 30 :  मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या शहरांबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, वाहतूक, पर्यटन आदी क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. परस्पर फायद्याच्या अशा या विपुल संधींचा फायदा अमेरिकन कंपन्यांनी घ्यावा. विकासाच्या या प्रवाहात राज्य सरकार एका भागिदाराची भूमिका निभावेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जॉन ब्रायसन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली.
या शिष्टमंडळात अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत पीटर हास, वाणिज्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकेतील विविध 16 उद्योग समुहांचे उच्चाधिकारी उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. ब्रायसन आणि त्यांच्या सोबतच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. ते म्हणाले अमेरिका आणि भारत यांच्यातील वाणिज्य व आर्थिक क्षेत्रातील सहकार्याची परंपरा फार जुनी आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशाला महाराष्ट्रासारख्या प्रगतीपथावरील राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र हे झपाट्याने नागरिकरण होणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. वाढत्या नागरिकरणामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने उभी होत आहेत.  विशेषत: पायाभूत सुविधांची उभारणी, शहरी वाहतुकीच्या सुविधा आणि घरबांधणी या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शासनाने खासगी-सार्वजनिक सहभागातून विकास करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अनेक ठिकाणी हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. 
मुंबई शहरामध्ये मेट्रो, मोनो रेल या माध्यमातून वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येत आहे.  नागपूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे उपराजधानीचे शहर आहे. या ठिकाणीही विशेष आर्थिक क्षेत्राची उभारणी करून नव्या आंतरराष्ट्रीय अद्ययावत कार्गो हब व विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारनेही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक निर्यात करणारे, सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेले
औद्योगिक राज्य आहे.  राज्यात पर्यटन विकासाच्याही अमर्याद संधी उपलब्ध आहेत.  या सर्व दृष्टीने महाराष्ट्रात अमेरिकन कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या विविध संधींचा फायदा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी शिष्टमंडळातील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींना केले. 
वित्तीय क्षेत्रात काम करण्यासाठीही उत्सुक – ब्रायसन
            अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जॉन ब्रायसन यांनी महाराष्ट्रातील विविध संधी आजमावण्यासाठीच आपण मुद्दामच आपल्यासमवेत अमेरिकेतील महत्त्वाच्या उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींना सोबत आणले आहे, असे स्पष्ट केले.  महाराष्ट्रातील औद्योगिक, पायाभूत सुविधा क्षेत्रातील संधींचा फायदा नक्कीच घेण्यात येईल आणि भारत व अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्र शासनाचा आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. औद्योगिक गुंतवणुकीबरोबरच वित्तीय क्षेत्रात काम करण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत, असेही श्री. ब्रायसन म्हणाले. 
या चर्चेवेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहूल अस्थाना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
            या शिष्टमंडळात ऑटो डेस्क, ब्लॅक अँड व्हिटेक कार्पोरेशन, सी. एच. रॉबिनसन वर्ल्डवाईल्ड, सीएचटूएम हिल इंडिया, ईएचडीडी आर्कीटेक्चर, जनरल इलेक्ट्रीक, इनोवारी, जेकब्ज इंजिनिअरिंग ग्रूप, लॉर्ड कार्पोरेशन, मॅझेटी नॅश, मिडवेस्टॉवको कार्पोरेशन, ओसी सॉफ्ट, प्राईसवॉटरहाऊसकुपर्स, टार्गेट इंजिनिअरिंग ग्रूप, सिनेरेन टेक्नॉलॉजी कार्पोरेशन, यूआरएस कार्पोरेशन आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. 
-----०-----

शुक्रवार, ३० मार्च, २०१२

वस्त्रोद्योग धोरण उद्योजकांना प्रोत्साहन देणारे --वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान


मुंबई, दि. 27 : एकेकाळी देशाचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबईतील वस्त्रोद्योगाची मागील काही वर्षात पिछेहाट झाली असल्याची कबुली देतानाच या क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाकांक्षी असे वस्त्रोद्योग धोरण आणले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्याबरोबर उद्योजकांना भरीव सवलती आणि प्रोत्साहन देणारे हे धोरण राज्यातील वस्त्रोद्योगाला नवे आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी  व्यक्त केला.
            वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक, विविध वस्त्रोद्योग संस्थांचे पदाधिकारी, ज्‍ज्ञ यांच्या उपस्थितीत कुलाब्यातील हॉटेल ताज महल पॅलेस येथे आज झालेल्या परिसंवादाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (एमईडीसी) आणि मल्टीनेट वर्ल्डवाईड यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. एमईडीसीचे अध्यक्ष विठ्ठल कामत, महासंचालक रवी बुध्दीराजा, मल्टीनेटचे अध्यक्ष विनोद गुप्ता, वस्त्रोद्योग विभागाचे  प्रधान सचिव सुनिल पोरवाल, केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त . बी. जोशी , सेंच्युरी टेक्सटाईल्सचे अध्यक्ष  आर. के. दालमिया, कोटक कंपनीचे अध्यक्ष सुरेश कोटक, आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक एस. के. श्रीनिवासन, टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिजचे  अध्यक्ष एस. के. सराफ, भारतीय कापड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राहूल मेहता आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाला मोठा वाव आहे, असे सांगून श्री. खान म्हणाले की, राज्यात दरवर्षी सुमारे 90 लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. पण यापैकी फक्त 20 लाख गाठी कापसावरच राज्यात प्रक्रिया होते. उर्वरीत कापूस प्रक्रियेसाठी शेजारच्या राज्यात जातो. या कापसावर राज्यातच प्रक्रिया व्हावी आणि त्यामाध्यमातू वस्त्रोद्योगाला चालना मिळावी यादृष्टीने उद्योजकांना अनेक सवलती आणि प्रोत्साहनपर योजना देणारे वस्त्रोद्योग धोरण राज्य शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी पुढे येऊन महाराष्ट्रात मोठ्या प्रणाणात गुंतवणूक करावी,  असे आवाहन श्री. खान यांनी यावेळी केले.
            सुयोग्य सामाजिक परिस्थिती, राजकीय इच्छाशक्ती, कायदा-सुव्यवस्था, कुशल कामगारांची उपलब्धता अशा सर्व बाबी लक्षात घेऊन गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे नेहमीच पहिल्या क्रमांकाचे राज्य राहिले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार 2001 ते 2010 दरम्यान राज्यात सुमारे 28 टक्के परकीय गुंतवणूक झाली आहे. या तुलनेत शेजारच्या गुजरात राज्यात फक्त सुमारे 6 टक्के परकीय गुंतवणूक झाली आहे, असे सांगून श्री. खान म्हणाले की, खागी उद्योजकांची वस्त्रोद्योगातील गुंतवणूक आणि शासनाचे त्याला मिळणारे प्रोत्साहन या माध्यमातून राज्याला अधिक आघाडीवर नेले जाईल
                                                                                                                                                ..2/-

वस्त्रोद्योग धोरण उद्योजकांना..                 : 2 :

            वस्त्रोद्योग धोरणातील तरतुदींचा लाभ मिळविण्यासाठी उद्योजकांना मंत्रालयात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. या धोरणातील सर्व तरतुदींची अंमलबजावणी बॅंकांच्या सहयोगातून ऑनलाईन पद्धतीने केली जाईल, असेही श्री. खान यावेळी म्हणाले. काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शासनाने सुतावरील कर 5 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तसेच यंत्रमागांसाठी  500 कोटी रुपयांची वीज सवलत जाहीर केली आहे. यापुढील काळातही वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून खागी वस्त्रोद्योजकांना मोठे लाभ दिले जातील. सुमारे 40 हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक, सुमारे 11 लाख नव्या रोजगारांची निर्मिती, राज्याच्या अविकसि कापूस उत्पादक क्षेत्राला लाभ आणि कापूस उत्पादकांना अधिक दर मिळण्यासाठी कटिबद्ध असलेले वस्त्रोद्योग धोरण राज्याच्या विकासाला चालना देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बंद पडलेल्या विविध वस्त्रोद्योग घटकांना प्रोत्साहीत करण्याबरोबरच जिनिंग, प्रेसिंग, विव्हिंग, टेक्निकल टेक्स्टाईल, ऍ़टो टेक्स्टाईल, गारमेंटींग अशा सर्वच वस्त्रोद्योग घटकांना प्रोत्साही केले जाईल. तसेच या सर्व घटकांना कुषल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयटीआयसारख्या संस्थांमार्फत विविध अभ्यासक्रमही चालविले जातील, असेही श्री. खान यावेळी म्हणाले.
            परिसंवादास उपस्थित उद्योजकांनी या वस्त्रोद्योग धोरणाचे स्वागत केले असून गुंतवणूकीसाठी नेहमीच बेस्ट डेस्टिनेशन असलेल्या महाराष्ट्रात आता वस्त्रोद्योगातील गुंतवणूकीलाही मोठा वाव आहे, अशा भावना व्यक्त केल्या. भारतीय कापड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राहूल मेहता म्हणाले की, या धोरणाच्या माध्यमातून शासनाने प्रथमच खागी वस्त्रोद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे उद्योजक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील. सेंच्युरी टेक्सटाईल्सचे अध्यक्ष आर. के. दालमिया म्हणाले की, देशात असे धोरण प्रथमच आले असून शासनाच्या सहकार्यातून उद्योजक याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील. केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त श्री. जोशी यांनीही या धोरणाचे स्वागत केले असून हे धोरण देशातील इतर राज्यांसाठी आदर्शवत आहे, असे ते म्हणाले.
            उपस्थित सर्व उद्योजक, तज्ञ, पदाधिकाऱ्यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. तत्पूर्वी, प्रधान सचिव श्री. पोरवाल यांनी उद्योजकांसमोर वस्त्रोद्योग धोरणाचे सादरीकरण केले.
000