शनिवार, १३ जून, २०१५

वर्ष एक आरंभ अनेक अभियानांतर्गत दुसाणे येथे जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन

धुळे, दि. 12 :- वर्ष एक आरंभ अनेक अभियान अंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालय, जळगाव व ग्राम पंचायत कार्यालय, दुसाणे ता. साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 जून, 2015 रोजी दुसाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या अभियानांतर्गत गावात जनजागरण होण्यासाठी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रचार फेरी नंतर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.  कार्यक्रमस्थळी बेटी बचाव, बेटी पढाव यांचे फोटो प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

धुळे, दि. 12 :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत पहिली व पाचवीत प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात येते.  ज्या पालकांना, पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश द्यावयाचा आहे.  त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्याकडे दि. 17 जून, 2015 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            याअंतर्गत पाचवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा दि. 9 मे, 2015 रोजी घेण्यात आली होती.  या परीक्षेत विद्यार्थी संख्येचा लक्षांक पूर्ण झालेला नाही म्हणून पाचवीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.  इयत्ता पहिली व पाचवीसाठी ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरले असतील.  त्यांनी पुन्हा फॉर्म भरू नये.
            साक्री तालुक्यातील मुलां, मुलींसाठी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे  येथे शिरपूर तालुक्यातील मुलां, मुलींसाठी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, शिरपूर (चोपडा जीन) ता. शिरपूर जि. धुळे येथे व शिंदखेडा जि. धुळे येथे दि. 20 जून, 2015 रोजी इयत्ता  पाचवीच्या प्रवेशासाठी  परीक्षा  होणार आहे.  या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनी अनुसूचित जमातीचा असावा.  दारिद्रय रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक द्यावा, पालकाची उत्पन्न कमाल मर्यादा एक लाखापर्यंत असावी.  पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे वय 5 वर्ष पूर्ण असावे. 

00000

नव्या सरकारची ध्येय धोरण तयार करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची पुणे येथे उद्या बैठक -- महसूल मंत्री एकनाथराव खडसे

धुळे, दि. 12 :- राज्यात नवीन स्थापन झालेल्या शासनाच्या ध्येय धोरणांद्वारे सामान्य जनतेपर्यंत विकासाचे कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची बैठक उद्यापासून दोन दिवस पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे महसूल, कृषी पदुम, मदत पुनर्वसन मंत्री श्री. एकनाथराव खडसे यांनी दिली.
            गेल्या 31 ऑक्टोबर, 2014 रोजी खडसे यांचेकडे महसूल विभागाची जबाबदारी आली आहे. राज्यामध्ये सत्तांतर होऊन महाराष्ट्रातील जनतेने नव्या सरकारला निवडून दिले आहे. या नवीन सरकारचा सामान्य जनतेच्या हिताच्या आणि विकासाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा असतो. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल विभागातील प्रांत, तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी यांच्याद्वारे जनतेच्या दैनंदिन तसेच विकासाची कामे पार पाडत असतात. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुध्दा महसूल विभागाचे महत्वाचे योगदान असते. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारची ध्येय धोरणे, भविष्यातील आगामी कार्यक्रम, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अथवा महसूली अधिकारी यांना येत असलेल्या अडचणी यांचा ऊहापोह करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 15 16 जून, 2015 रोजी पुणे येथील यशदा सभागृहात आयोजित केलेली आहे. यावेळी जिल्ह्यातील मुख्य प्रश्नांची माहिती संबंधित जिल्हाधिकारी महसूल मंत्री श्री. खडसे यांना अवगत करणार आहेत. नव्या सरकारच्या ध्येय धोरणाद्वारे सध्या प्रशासनासमोर असलेल्या अडचणी दूर करुन सुप्रशासन, गतीमान प्रशासन कसे आणता येईल, याबाबत या बैठकीमध्ये विचारमंथन होणार असल्याचे श्री. खडसे यांनी सांगितले. लोकशाही लोकविकास या दोन संकल्पनामध्ये -गव्हर्नन्सचा वापर करुन जनहिताची कामे त्वरेने कसे करता येतील यावर महसूल विभागाचे लक्ष केंद्रित करण्याबाबत श्री. खडसे यांनी यापूर्वी सर्व विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या असून शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची कामे मंत्रालयापर्यंत येता स्थानिक पातळीवरच कसे सोडविता येतील, याबाबत काही धोरण तयार करता येतील काय, याबाबत सुध्दा या बैठकीत विचार होणार असल्याची माहिती श्री. खडसे यांनी याप्रसंगी दिली. सदर बैठकीसाठी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच इतर महत्वाचे अधिकारी येत आहेत. सदर बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री श्री. खडसे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त श्री. चोकलिंगम यांचेकडे देण्यात आली असून महसूल मंत्री खडसे हे स्वत: बैठकीसाठी रविवार पासून तीन दिवस पुणे येथे उपस्थित राहणार आहेत.

000000

गुरुवार, ११ जून, २०१५

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना

मुंबई, दि.8 : परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली असून या बाबतची  अधिसूचना रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
          या परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम), राज्यमंत्री (परिवहन), राज्यमंत्री (गृह), अपर मुख्य सचिव (गृह), अपर मुख्य सचिव (परिवहन),सचिव, सार्वजनिक बांधकाम (राज्य व राष्ट्रीय महामार्ग), आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई, संचालक, मार्ग परिवहन मध्यवर्ती परिवहन संस्था, पुणे हे सदस्य असून परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे सदस्य सचिव आहेत.
या परिषदेच्या बैठकींसाठी विशेष निमंत्रित अधिकारी म्हणून अपर मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य), प्रधान सचिव (नगर विकास-2), प्रधान सचिव (शालेय शिक्षण), महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण; महासंचालक, माहिती व जनसंपर्क ;तसेच अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन, मुंबई; संचालक, मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी,; अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रक टेम्पो ओनर्स असोसिएशन हे असणार आहेत.
 प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अथवा पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ते सुरक्षा समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून या समितीमध्ये  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपरिषदेचा मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा नगरपालिका उपआयुक्त हे सदस्य असतील तर प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

००००

दहावी व बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा -विनोद तावडे

मुंबई, दि.8: दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जवाहर बालभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करुन श्री. तावडे  म्हणाले की, जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी निराश न होता अंगभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करुन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल असे श्री. तावडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फेरपरीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल. यावर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत  अशा प्रकारची फेरपरीक्षा घेता येईल का, याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल चांगला लागला असून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात एकूण 14 लाख 37 हजार 922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यभरात 11 वीच्या प्रवेशासाठी 15 लाख 68 हजार 664 जागा उपलब्ध आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ 8 टक्के विद्यार्थी नापास झाले असून या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांनी करिअर विषयकउपक्रम राबवावेत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
000


बुधवार, १० जून, २०१५

औरंगाबाद प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्रात प्रवेश अर्ज 30 जून पर्यंत स्वीकारणार

धुळे, दि. 10 :- औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद या संस्थेत सन 2015-16 या चालू शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे.  प्रवेश  अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 असून गरजूंनी प्रत्यक्ष किंवा पत्राद्वारे या संस्थेस संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
             विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत अधीक्षक, शासकीयच प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 13, एन-12, हडको, टी.व्ही. सेंटर रोड, औरंगाबाद येथून विनामूल्य प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावे.  अर्जासोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, पालकाचा उत्पन्नाचा दाखला, इयत्ता 4 थी, इयत्ता नववी पासचे गुणपत्रक, तीन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
             या संस्थेत शिवणकला, आर्मेचर वायडींग (विद्युत), हस्त जुळाई व छपाई, पुस्तक बांधणी तसेच सर्व प्रशिक्षणार्थीसाठी फिटर या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.  शिवणकला व पुस्तक बांधणीसाठी चौथी उत्तीर्ण व हस्तजुळाई व छपाई तसेच आर्मेचर वायडिंग (विद्युत) साठी उमेदवार नववी उत्तीर्ण असावा.  या संस्थेत वय 16 ते 45 या वयोगटातील अस्थिव्यंगानाच प्रवेश दिला जातो.
000000


नाशिक सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृहात प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

धुळे, दि. 10 :- नाशिक येथे युध्द विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या मुलां-मुलींसाठी  सैनिकी मुलींचे वसतिगृह, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-2315065 आणि सैनिकी मुलांचे वसतिगृह, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-2315246 सर्वसोयींनी युक्त अशी वसतिगृहे, पत्रकार कॉलनी, शासकीय दूध डेअरी जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे.  प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका यांचेकडे दूरध्वनीवरून अथवा समक्ष संपर्क साधून वसतिगृह प्रवेश पुस्तिका प्राप्त करून घ्याव्यात.  या संधीचा जास्ती-जास्त माजी सैनिक पाल्यांनी तसेच इतरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे/नंदुरबार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त) सोपान डोके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            या वसतिगृहांमध्ये इयत्ता 10 वी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या युध्दविधवा पाल्य, माजी सैनिक विधवा पाल्य, माजी सैनिक व युध्दात जखमी झालेल्या माजी सैनिकांचे पाल्य व सेवारत सैनिक पाल्य व त्यांची पत्नी यांना प्रवेश देण्यात येईल.
            दरमहा आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.  त्यात सेवारत सैनिकाच्या भोजन, निवास व सेवा करासह अधिकारी-1 हजार रूपये, जेसीओ-900 रूपये, शिपाई/एनसीओ-700 रूपये, माजी सैनिकाच्या भोजन, निवास व सेवा करासह- अधिकारी व ऑन कमिशन्ड अधिकारी-900 रूपये, जेसीओ-800 रूपये, शिपाई/एनसीओ साठी 600 रूपये तसेच इतर नागरिकाच्या भोजन, निवास व सेवा करासह पूर्ण दर 1,800 रूपये राहील.   युध्दविधवा व इतर माजी सैनिक विधवांच्या सर्व पाल्यांना तसेच अनाथ पाल्यांना भोजन, निवास व सेवा शुल्क मोफत आहे.  सैनिकांचे पाल्य भरून झाल्यावर जागा रिक्त असल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांचा, तिसऱ्या, अंतिम फेरीत विचार करण्यात येईल, असेही पत्रकात नमूद केले आहे.

00000