शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

दहा महानगरपालिकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 54 टक्के मतदान


मुबंई, दि. 16 : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे 54 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळित पार पडली, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वत: मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्रांची पाहणी केली, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळितपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत.  
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे: बृहन्मुंबई- 46, ठाणे-52 , उल्हासनगर-43 , नाशिक-58 , पुणे-53 , पिंपरी-चिंचवड-56 , सोलापूर-58 , अमरावती- 58, अकोला- 57, नागपूर- 55, एकूण- 54

0-0-0