मंगळवार, २३ जून, २०१५

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 65 मि. मी. पावसाची नोंद

          धुळे, दि. 23 :- जिल्ह्यात चोवीस तासात 65 मि.मी. पावसाची नोंद झालेली असून  जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी व एकूण पावसाची आकडेवारी कंसात दिलेली आहे.  ती खालीलप्रमाणे आहे.
          धुळे तालुका- 24 मि.मी. ( 106 मि.मी.), साक्री तालुका- 04 मि.मी. ( 82 मि.मी.), शिरपूर      तालुका-29 मि.मी. (175 मि.मी.), शिंदखेडा तालुका- 08 मि. मी. ( 172 मि.मी.) पावसाची नोंद झालेली आहे.

0000000

दहिवद येथे 25 जून रोजी ‘रोजगार मेळावा’

        धुळे, दि. 23 :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे व रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. दहिवद ता. शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार   दि. 25 जून, 2015 रोजी सकाळी 11-00 वाजता ‍िशरपूर तालुक्यातील दहिवद येथील रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. येथे नोंदणीकृत उमेदवारांच्या रोजगार सहाय्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या रोजगार मेळाव्याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
             या मेळाव्यासाठी रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. दहिवद येथील उद्योजक मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची जागेवरच निवड करणार आहेत.  त्‍यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या किमान एस.एस.सी., एच.एस.सी. उत्तीर्ण व 18 ते 35 वर्षे या वयोमर्यादेतील ज्या उमेदवारांची खाजगी क्षेत्रातील उद्योजकांकडे काम करण्याची तयारी आहे, त्यांनी उपस्थित रहावे.  सोबत येतांना शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो व बायोडाटा यासह स्व:खर्चाने उपस्थित रहावे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000000

नवीन बाल कामगारांच्या विशेष प्रशिक्षण केंद्राचे प्रस्ताव निकषानुसार तपासा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 23 :- जिल्ह्यात बंद असलेली  बाल कामगार विशेष प्रशिक्षण केंद्र  नव्याने सुरू करण्यासाठी सेवाभावी स्वंयसेवी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांची निकषानुसार तपासणी करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  दिले.
            राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात  आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे,  सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, सरकारी कामगार अधिकारी आर. टी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल भामरे, शिक्षणाधिकारी (निरंतर) बी. जे. पाटील,  औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक  पंकज जाधव, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे मास्टर ट्रेनर व्ही. ए. देशमुख, फिल्ड ऑफिसर डी. यु. बडगुजर, श्रीमती एन. बी. काळोखे, श्रीमती जयश्री निकम  आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, सेवाभावी स्वयंसेवी संस्थांकडून 23 विशेष प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यापैकी जे अर्ज दिलेल्या निकषानुसार परिपूर्ण आहेत अशाच अर्जांची  प्रशिक्षण केंद्राच्या  ठिकाणी  संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन दिलेल्या यादीनुसार बाल कामगार आहेत किंवा नाही, तसेच ज्या जागेवर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे ती जागा निकषानुसार आहे किंवा नाही,  याबाबतची तपासणी करावी, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

00000

नाशिक विभागाची साध्य आधारीत मुल्यांकन पद्धत राज्यस्तरावर

          नाशिक दि.20 नाशिक विभागाचे आयुक्त एकनाथ डवले यांनी विभागातील अधिकाऱ्यांच्या वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक मुल्यांकनासाठी सुरू केलेल्या साध्य आधारीत मुल्यांकन पद्धत राज्यस्तरावार सुरू करण्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परिषदेत घेण्यात आला.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत या पद्धतीमुळे विभागीय पातळीवरील प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर झालेल्या सकारात्मक बदलांचे सादरीकरण श्री.डवले यांनी केले. या पद्धतीमुळे उद्दीष्ट पूर्तीबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसीत होण्यात मदत झाली आहे.  जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पुरवठा, सामाजिक अर्थसहाय्य योजना, महात्मा बांधी गा्रमीण रोजगार हमी योजना, आणि इतर विषय महसुल व्यतिरिक्त बाबींमध्ये असल्याने त्यांचे सर्वंकष मुल्यांकन करणे शक्य झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजातही या पद्धतीमुळे लक्षणीय सुधारणा झाली असून नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहनदेखील मिळाले आहे.
कॉर्पोरेट जगतात याच पद्धतीने मुल्यांकन करण्यात येते.  त्याच धर्तीवर अंमलात आणल्या जाणाऱ्या या प्रणालीची सुरुवात मे 2014 मध्ये नाशिक विभागातील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी चर्चा करून करण्यात आली. त्यासाठी रिझल्ट फे्रमवर्क डॉक्युमेंट (आरएफडी) तयार करण्यात आले. हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरएफडीबाबत करण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हास्तरावरील आरएफडीचे प्रारुप तयार केले. मे 2015 मध्ये त्यांला अंतिम रुप देण्यात आले.
या मुल्यांकन पद्धतीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व लाईन डिपार्टमेंटचा समावेश आहे. प्रमुख विषय आणि उपविषय यांना भारांकन निश्चित करण्यात आले आहे. अधिकारी  कामगिरीनुसार भारांकन निश्चित करून तो आरएफडीमध्ये भरतात. ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे हे सर्व अहवाल शेअर केले असल्याने  विभागीय आयुक्तांना अवलोकन करून संबंधितांना आवश्यक असल्यास सुचना देणे व कामगिरी उंचावण्यासाठी मार्गदर्शन करणे शक्य होते.
जिल्हाधिकारी मुल्यांकनासाठी प्रशासकीय बाबींसाठी 10.0, शासकीय महसूल वसुली 15.0, अर्धन्यायीक प्रकरणे-प्रतिबंधक कार्यवाहीच्या प्रकरणासह 8.5, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, 9.0 राष्ट्रीय भूमी अभिलेख व्यवस्थापन 2.5 नैसर्गिक आपत्ती 3.0, जलयुक्त शिवार अभियान 13.0, नाविन्यपूर्ण उपक्रम 9.5, मग्राराहयो 4.0, पुरवठा 5.0, नगरपालिका प्रशासन 6.0, भुसंपादन व पुर्नवसन 5.0, निवडणूक 3.0, नियोजन 4.5 आणि सामाजिक आर्थिक सहाय्य योजना व आम आदमी विमाय योजनेसाठी 2.0 याप्रमाणे भारांक निश्चित करण्यात आले आहे. याच धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांचेसाठी विविध कामांचे भारांक निश्चित करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे एखाद्या कामासाठी निश्चित केलेल्या भारांकानुसार प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:चा आरएफडी सादर करताना उद्दीष्ट व पुर्ण केलेले काम यानुसार भारांक स्वत: भरलेले असल्याने पारदर्शकता राहण्याबरोबरच त्या अधिकाऱ्याचे वार्षिक मुल्यांकनही वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे शक्य झाले आहे. अहवालात विषय आणि उपविषय यांचे सुक्ष्म विश्लेषण असून त्यापुढे भारांकन नमूद असल्याने कोणत्याही कामाची प्रगती तात्काळ लक्षात येते. प्रशासकीय बाबी, महसूली वसूली, सुवर्ण जयंती राजस्व अभियान यासारख्या मुख्य विषयापासून सेवा निवृत्ती प्रकरणे, सेतू सुविधा, अभिलेख वर्गीकरण, ई-ऑफीस प्रणाली आदी कार्यप्रणालीतील सुधारणांपर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश या प्रणालीत असल्याने तिचे उपयुक्तता मुल्य अधिक आहे.
या पद्धतीद्वारे उद्दीष्ट आणि साध्यात सुस्पष्टता आल्याने ती सहजतेने अंमलात आणणे शक्य झाले आहे. गुगल ड्राईव्हर तहसीदार स्तरावरून माहिती भरण्यात येत असून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला माहिती अंतिम केली जाते. त्यानंतर नव्याने त्या महिन्याची माहिती भरता येत नाही.
मुल्यांकन पद्धत सुरु होण्यापूर्वी अभिलेखांचे वर्गीकरण, रोख पुस्तकातील रक्कम व बँक खात्यातील प्रत्यक्ष शिल्लक रक्कम यातील तफावत दूर करणे, न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे, नाविन्यपूर्ण उपक्रम, सेवानिवृत्ती प्रकरण, अतिक्रमीत रस्ते लोकसहभागातून मुक्त करणे आदी विषयांच्या आढावा फारसा होत नसे. भारांकनामुळे या विषयांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.
एकूणच पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता असे दुहेरी वैशिष्ट्य असणाऱ्या या पद्धतीमुळे नाशिक विभागातील कामकाजात अनुकूल बदल झाले आहेत. हे बदल लक्षात घेऊन या प्रणालीचा राज्यभर उपयोग करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. प्रशासकीय गतिमानतेचा हा नाशिक पॅटर्न कामकाजातील सकारात्मक बदलांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.


अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींनी निवासी शाळेत वेळेत प्रवेश घ्यावा

धुळे दि. 22 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा, सोनगीर व अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची निवासी शाळा, भाडणे ता. साक्री या ठिकाणी सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तात्काळ  प्रवेश घ्यावा. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थी / विद्यार्थीनींना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य, गणवेश, खेळ, करमणुक तसेच इतर सर्व सोयी सुविधा शासनामार्फत मोफत पुरविल्या जातात. प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, रहिवाशी दाखला, गुणपत्रक इ. प्रमाणपत्राच्या सत्यप्रती इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी श्रीमती वनिता शिवाजी बेरड,  मुख्याध्यापक, एस. एन. सोनवणे, गृहपाल, अनुसूचित जाती व नवबौध्द मलांची निवासी शाळा, सोनगीर, श्रीमती दिपमाला पानपाटील,  मुख्याध्यापक, श्रीमती एस. आर. वळवी, गृहपाल,  अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा, भाडणे ता. साक्री जि. धुळे  या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000


जवाहर नवोदय विद्यालयाचा इयत्ता सहावीचा निकाल जाहीर

धुळे, दि. 22 :- मेहेरगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा इयत्ता सहावी वर्गाचा  सन 2015-16 चा निकाल  नुकताच जाहीर करण्यात आला आहे.  सदर निकाल विद्यालयाच्या नोटीबोर्डवर तसेच  www.nvsropune किंवा www.navodaya.nic.in  या  वेबसाईटवर उपलब्ध आहे.  तसेच निकालाची प्रत शिक्षणाधिकारी, धुळे व गट शिक्षणाधिकारी, धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर यांच्या कार्यालयात उपलब्ध  असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

24 जून रोजी निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा

धुळे, दि. 22 :- जिल्हा कोषागारामार्फत  बुधवार दि. 24 जून, 2015 रोजी सकाळी 11-00 वाजता संतोषी माता चौकातील शिवतीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला  आहे.  तरी ज्या निवृत्ती वेतन धारकांना आपल्या निवृत्ती वेतन विषयी अडचणी, शंका असतील अशा निवृत्ती वेतन धारकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 24 जून

मुंबई, दि. 22 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे चालविण्यात येणा-या  मुंबईतील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत कोपा (1 वर्ष). डी.टी.पी. (1 वर्ष) ह्या ट्रेडकरीता प्रवेशसत्र ऑगस्ट 2015 करीता प्रवेश उपलब्ध आहेत. या ट्रेडकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम मुदत 24 जून 2015 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचा आहे. हा प्रवेश अर्ज www.admissian.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावा, असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.

0000000

राज्यातील अभयारण्यांची संख्या वाढवण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री

मुंबई दि. २२:  राज्यातील  अभयारण्यांची संख्या वाढवण्याचा महत्वाचा निर्णय पुनर्रचित वन्यजीव मंडळाच्या आजच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
            महाराष्ट्र राज्य पुनर्रचित वन्यजीव मंडळाची पहिली बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्य मंत्री राम शिंदे,  आमदार  बंटी भांगडिया,
श्री. प्रभुदास भिलावेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) अनिल सक्सेना, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, आणि वन्यजीव  मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
            आजच्या बैठकीत  राज्यात नवीन अभयारण्य आणि संवर्धन राखीव निर्मितीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यात ठाणे खाडी फ्लेमिंगो  अभयारण्य (१६.९० चौ.कि.मी), विस्तारित कर्नाळा अभयारण्य (६.८५४ चौ.कि.मी, तोरणमाळ संवर्धन राखीव क्षेत्र (९१.५२ चौ.कि.मी),  अंजनेरी संवर्धन राखीव (५.६९ चौ.कि.मी ) या प्रस्तावांचा समावेश आहे.  ठाणे खाडी क्षेत्र हे आशिया खंडात आढळणाऱ्या मोठ्या खाडी क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. या खाडीच्या दोन्ही बाजूस चांगल्या प्रकारचे कांदळवन आढळून येते. येथे भरती आणि ओहोटीच्या काळात  हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो आणि इतर  २०५ प्रजातींचे विविध पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. ही बाब विचारात घेऊन या क्षेत्राला पक्षी अभयारण्याचा दर्जा देऊन रामसर साईट म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव युनेस्कोकडे सादर करण्याचेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
            वर्धा-नागपूर जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन  (क्षेत्रफळ 661.16चौ.कि.मी. ) तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन  (क्षेत्रफळ 1247.46 चौ.कि.मी.) घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण स्थापन करण्यात यावे,  अशी सूचना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्य वन्यजीव रक्षक यांना प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या कल्याणाकडे पुरेसे  लक्ष देणे शक्य नसल्याने राज्यात असे प्राधिकरण स्थापन करणे उपयुक्त ठरेल, जेणेकरून राज्यातील विविध यंत्रणांमार्फत चालविण्यात येणारी प्राणीसंग्रहालये एकाच छताखाली येतील.
            राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात जे विकासात्मक प्रकल्प केंद्र शासनाच्या अंतिम मंजूरीनंतर केले जातात त्या प्रकल्प यंत्रणेकडून प्रकल्प किंमतीच्या २ टक्के निधी वन विभागाकडे जमा केला जातो.  या निधीचा विनियोग वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्ररीत्या महाराष्ट्र वन्यजीव निधीस्थापन करण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


 ब्ल्यू मॉरमॉन  राज्य फुलपाखरू
            महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्‍ट्राचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फूल जारूल यापूर्वीच घोषित करण्यात आलेले आहे. याच धर्तीवर राज्यातील राज्य फुलपाखरू म्हणून आजच्या बैठकीत ब्ल्यु मॉरमॉन  यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दक्षिण भारतात आढळणाऱ्या आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलपाखरू  आहे.
            राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या धर्तीवर राज्यात वन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  स्थायी समितीची स्थापना करणारा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
            आजच्या बैठकीत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यात व त्याच्या १० कि.मी परिसरात विकासात्मक कामे करण्यासाठी वनजमीन वळतीकरण तसेच अभयारण्याच्या सीमेत बदल करण्याच्या काही प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये २.७२ एकर एवढे क्षेत्र हवाई दलास  ३० वर्षाच्या भाडेतत्त्वावर यापुढे लीज देण्यास मान्यता देण्यात आली.
            बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच चंद्रपूर येथे देखील बिबट सफारीसही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
            राज्यात जमा होणाऱ्या  सीएसआर निधीतील  (corporate social responsibilityfund)  काही रक्कमराज्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षण राखीव क्षेत्रांच्या विकासासाठी, वृक्ष लागवडीसाठी  उपयोगात आणता  येऊ शकेल का , यादृष्टीने वन विभागाने नियोजन विभागाशी संवाद साधून अधिक माहिती घ्यावी अशी सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

0000

विमानतळ परिसरातील विनावापर जमीनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.22: मिहान प्रकल्प विमानतळानजीकची जमीन उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना वितरीत करण्यात आली होती. तथापि, उद्योजकांनी त्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे अशा जमीनी परत घेण्याबाबत धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.
            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची50 वी बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस.मीना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक अशिषकुमार सिंह, नागपूर सुधार न्यासचे अध्यक्ष श्याम वर्धने आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या क्षेत्रात आयटी टाऊनशिप करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करावे. स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होईल याचेही नियोजन करावे. विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी कार्यवाही सुरु केली आहे. त्यांना सवलत देण्याबाबत विचार करावा. शिर्डी येथील विमानतळ परीसर विकास करण्यासाठी नियोजन प्राधिकारी म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस नियोजन प्राधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच मिहानसाठी विकास नियंत्रण नियमावली व आराखडा नव्याने तयार करण्यास या बैठकीस मान्यता देण्यात आली.
            विमानतळ परिसरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छतेची सप्तपदी कार्यक्रम राबवावी. अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद येथील विमानतळ विकासित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
0000


शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणात एकही घर, वाडी-वस्ती सुटणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 20 :- 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य बालकांचे  दि. 4 जुलै, 15 रोजी जिल्ह्यात होणाऱ्या सर्वेक्षणात एकही घर, वाडी-वस्ती सुटणार नाही अशी लोकचळवळ जिल्ह्यात व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात राज्यातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षणाच्या जिल्हास्तरीय समिती सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. राहूल चौधरी, महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, सर्वेक्षण अधिकारी म्हणून जिल्हा परिषद शिक्षक आणि खाजगी माध्यमिक शाळांचे शिक्षक घ्यावेत, 20 सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर एक झोनल ऑफीसर म्हणून खाजगी, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी.  20 झोनल ऑफीसरांवर एक नियंत्रक अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, तालुका पातळीवर  सर्वेक्षण अधिकारी, झोनल ऑफीसर व नियंत्रक अधिकारी यांच्यासाठी  दि. 29 जून  रोजी धुळे व साक्री तालुका, दि. 30 जून, 15 रोजी शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात कार्यशाळा घेण्यात याव्यात.  तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुकास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पुढील नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000000