बुधवार, २५ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिनाची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम



          मुंबई, दि. 24 : प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिन सोहळा 26 जानेवारी 2012 रोजी शिवाजीपार्क येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याची रंगीत तालीम शिवाजी पार्क, दादर येथे आज आयोजित करण्यात आली होती.
            राष्ट्रध्वज वंदन व संचलन सोहळ्याच्या रंगीत तालमीस राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, अप्पर पोलीस महासंचालक के. के. पाठक, विशेष पोलीस महानिरिक्षक हेमंत नगराळे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी शैलेश बिजूर तसेच पोलीस विभागाचे व अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            भारतीय नौदल, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 8, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 11, मुंबई सशस्त्र पोलीस दल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई रेल्वे पोलीस दल, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, सशस्त्र होमगार्ड (पुरुष/महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल (पुरुष/महिला), मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सी.कॅडेट कोअर (मुले/मुली), आर. एस. पी. (मुले/मुली), ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग  (चित्ररथ) तसेच कोळी नृत्य, नाशिक जिल्ह्याचे सोंगी मुखवटे नृत्य, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नृत्य आणि लावणी या पथकांनी संचलनात सहभाग घेतला होता.
            1 मे 2011 रोजी महाराष्ट्र राज्याच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट संचलन करणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट - 8 कंपनी क्र. 1 (प्रथम क्रमांक), राज्य राखीव पोलीस बल क्र. 8 कंपनी क्र. 2 (द्वितीय क्रमांक), राज्य राखीव पोलीस बल क्र. 11 (तृतीय क्रमांक) या पथकांना यावेळी गौरविण्यात आले.
0 0 0 0

उमलू द्या कळ्यांना



बाप म्हणे लेकी  तु गं साखरेचं पोतं. . .
परि तुझ्या नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतांना दिसत आहे.
            जणगणना 2011 मधून स्पष्ट झालेलं वास्तव समजून घ्यायचे असेल तर यातील सांख्यिकीय माहितीकडे केवळ आकडेवारी म्हणून आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. यातून स्पष्ट होणारी सामाजिक विषयमतेची दरी आणि त्यातून भविष्यात निर्माण होणारा गंभीर सामाजिक प्रश्न याकडे आपल्याला आत्ताच लक्ष द्यावे लागेल.
            काय आहे वास्तव जाणून घेऊया !
            जणगणना 2011 प्रमाणे भारताची लोकसंख्या 1,210,193,422 इतकी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 623,724,248 तर स्त्रियांची लोकसंख्या 586,469,174 इतकी आहे. यामध्ये 1 हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण 940 आहे.  यातील ग्रामीण महिलांचे प्रमाण 947 तर शहरी भागातील महिलांचे प्रमाण 926 इतके आहे.
            देशामध्ये केरळ राज्य हे लिंग गुणोत्तर सर्वात वरच्या स्थानावर असून तिथे 1 हजार पुरुषांमागे 1084 महिला आहेत. येथे ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण 1077 आणि शहरी भागात 1091 इतके आहे. चंदिगढ च्या ग्रामीण भागात हे प्रमाण 691 इतके कमी आहे तर दमन आणि दीव मध्ये  नागरी भागात लिंग गुणोत्तराचे प्रमाण देशात सर्वात कमी असून ते 1 हजार पुरुषांमागे 550 स्त्रिया इतके आहे. देशातील आठ राज्यांनी ग्रामीण भागात लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात घट दर्शिवली असून यामध्ये जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र कर्नाटक, आणि लक्षद्वीप या केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे तर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशांने ही नागरी भागात स्त्रियांच्या प्रमाणात घट दर्शविली आहे.
            2011 च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा या वयोगटातील बालकांच्या लिंग गुणोत्तरात लक्षवेधी घट       झाल्याचे दिसून आले आहे.2001 च्या जणगणनेनुसार देशात  या वयोगटात 1 हजार मुलांमागे 927 मुली होत्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण 934 इतके होते तर शहरी भागातील मुलींचे प्रमाण 906 इतके होते. 2011 मध्ये 1 हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी होऊन 914 इतके झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण 919 तर शहरी भागातील प्रमाण 902 इतके आहे.
            म्हणजेच ग्रामीण भागात या वयोगटातील मुलींची घट ही 15 पॉईंटची आहे तर शहरी भागात ही घट  4 पॉइंटची आहे. मागील दशकात म्हणजे 2001 ते 2011 मध्ये 1 हजार बालकांमागे दिल्ली राज्यात  ग्रामीण भागात मुलींची संख्या सर्वात कमी झाली असून ती 809 इतकी आहे तर नागालँडमध्ये नागरी क्षेत्रात या वयोगटात लिंग गुणोत्तराचे सर्वात अधिक प्रमाण नोंदविण्यात आले असून ते 1 हजार मुलांमागे 979 इतके आहे. 
महाराष्ट्राची ग्रामीण आणि शहरी भागातील स्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला 2011 च्या जनगणनेनुसार समोर आलेली आकडेवारी अभ्यासावी लागेल.


                                                                                                                                     ..2/-
उमलू द्या कळ्यांना..                                          : 2 :

या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एकूण 11,23,72,972 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 6,15,45,441 तर शहरी भागाची लोकसंख्या 5,08,27,531 इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5,83,61,379 इतके आहे. ती ग्रामीण भागात 3,15,93,580 इतकी आहे तर शहरी भागात 2,67,67,817 इतकी आहे. राज्यात महिलांची एकूण लोकसंख्या 5,40, 11,575 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची लोकसंख्या 2,99,51,861 तर शहरी भागातील महिलांची लोकसंख्या 2,40,59,714 इतकी आहे.
दशकामध्ये राज्याच्या लोकसंख्येत 15.99 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाची टक्केवारी 10.34 तर शहरी भागाची 23.67 टक्के इतकी आहे.या वाढीत पुरुषांची टक्केवारी  15.80 तर महिलांची टक्केवारी 16.21 टक्क्यांची आहे.
राज्यात शून्य ते सहा वयोगटात एकूण लोकसंख्या 1,28,48,375 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या 74,45,853 तर शहरी भागातील लोकसंख्या 54,02,522 इतकी आहे.
यामध्ये मुलांची एकूण लोकसंख्या 68,22,262 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या 39,61,420 तर शहरी भागातील लोकसंख्या 28,60,842  इतकी आहे.
यामध्ये मुलींची एकूण लोकसंख्या 60,26,113 इतकी आहे. ग्रामीण भागातील या वयोगटातील मुलींची लोकसंख्या 34,84,433 तर शहरी भागातील लोकसंख्या 25,41,680 इतकी आहे.
महाराष्ट्राची एकूण साक्षरतेची टक्केवारी 82.91 टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण 77.09 तर शहरी भागाचे प्रमाण 89.84 टक्के इतके आहे.
एकूण साक्षरतेत पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 89.82 टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 86.39 तर शहरी भागातील साक्षरतेची टक्केवारी 93.79 टक्के इतकी आहे.
एकूण साक्षरतेत महिलांची साक्षरतेची टक्केवारी 75.48 टक्के इतकी असून यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण 67.38 टक्के तर शहरी भागाचे प्रमाण 85.44 टक्के इतके आहे.
          राज्यातील 1991 ते 2011 लिंग गुणोत्तराचे प्रमाण
                 (एक हजार पुरुषांमागे महिला )

1991
2001
2011
एकूण
934
922
925
ग्रामीण
972
960
948
शहरी
875
873
899

             राज्यातील 1991 ते 2011  लिंग गुणोत्तराचे प्रमाण
             (शून्य ते सहा वयोगट एक हजार मुलांमागे मुली  )

1991
2001
2011
एकूण
946
913
883
ग्रामीण
953
916
880
शहरी
934
908
888

                                                                                                                                                 3/-

उमलू द्या कळ्यांना..                                                      : 3 :

            या आकडेवारीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, 1991 ते 2011 या कालावधीत महिलांच्या प्रमाणात दर हजार पुरुषांमागे 934 वरून 925 इतकी घट झाली आहे तर शून्य ते सहा या वयोगटात याच कालावधीत 1 हजार मुलांमागे 946 वरून 883 इतकी मुलींची लक्षणीय घट झाली आहे.
महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात टॉपचे  पाच जिल्हे
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
रत्नागिरी
1,123
1,146
1,013
2
सिंधुदूर्ग
1,037
1,046
981
3
गोंदिया
996
998
984
4
सातारा
986
993
955
5
भंडारा
984
984
982

महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे  पाच जिल्हे
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
मुंबई
838
---
838
2
मुंबई उपनगर
857
---
857
3
ठाणे
880
954
859
4
पुणे
910
927
899
5
बीड
912
909
926

महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात टॉपचे  पाच जिल्हे (शून्य ते सहा वयोगट )
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
गडचिरोली
956
961
918
2
चंद्रपूर
945
958
919
3
गोंदिया
944
947
927
4
रत्नागिरी
940
942
928
5
भंडारा
939
944
915
महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे  पाच जिल्हे शून्य ते सहा वयोगट )
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
बीड
801
789
848
2
जळगाव
829
830
827
3
अहमदनगर
839
837
848
4
बुलढाणा
842
841
847
5
कोल्हापूर
845
842
852

ही आकडेवारी पाहिली तर देश आणि राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण लक्षात येते. याचा समिक्षात्मक अभ्यास केला तर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आणि शून्य ते सहा वयोगटात मुलांच्या तुलनेत मुलींचे दर हजारी प्रमाण कमी होत असून ती चिंतेची बाब आहे.सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढू द्यायची नसेल तर सावधान ! आत्ताच या गोष्टीला गांभीर्याने घेऊन पाऊले उचलण्याची गरज आहे.
            असं का? याचं उत्तर शोधण्याची आता खरी वेळ आलीय. खरचं मुला-मुलीत फरक असतो? कुठल्या क्षेत्रात मुली, मुलांच्या तुलनेत मागे आहेत?  आज किती आई-वडील मुलांपेक्षा मुलींकडे जास्त राहातात किंवा किती मुली आई वडीलांचा म्हतारपणाचा आधार झाल्या आहेत हे जर पाहिलं तर अनेक लोकांकडे, कुटुंबाकडे याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील.                       
              बचतगटातील महिलांपासून अवकाशात भरारी घेणाऱ्या अंतराळवीरांपर्यंत मुलींनी विविध क्षेत्रात मिळवलेलं  यश पाहिले तर मुला-मुलीत करण्यात येत असलेला भेदभाव किती तकलादू आहे हे लक्षात येतं. सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे आता सगळ्यांना पटू लागलं आहे.  महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंपासून अलिकडच्या काळात मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांच्यापर्यंत महिलांचे काम पाहिले तर महिलांनी कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक विकास आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी दिलेलं योगदान लक्षवेधी ठरतं.
     अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. यामध्ये पहिलं ताट तिला, चला मुलींचे स्वागत करू या,  नकोशी होतेय हवीशी, राखीसाठी बहीण हवी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचीही राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. परंतु सर्व प्रश्न कायद्याने सुटतात असं अजिबात नाही. त्यासाठी गरज आहे ती मानसिकता बदलाची.
    गावात नदी आणि घरात मुलगी असायलाच हवी अशी जुनी जाणती माणसं नेहमी म्हणायची. नदी हे जीवनाचं, समृद्धीचं प्रतीक तर घरात मुलगी असणं हे हासू-आसू, फॅशन,कला-साहित्य-संस्कृती, नाविन्य, नात्यातल्या जिव्हाळ्याचा रेशीमबंध जिवंत असल्याचं प्रतीक. म्हणनूच तर  घरात मुलगी झाली तर लई         झाल्या लेकी नको म्हणू बापा, उडूनिया जाईल तुझ्या चिमण्यांचा ताफा. . . असं सांगून ही माणसं मुलीच्या जन्माचं स्वागत करायला लावायची. आज पुन्हा हीच संस्कृती, हाच विचार समाजमनात रुजवायचा असून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय. . . कळ्यांना अवेळी खुडण्याआधी पूर्ण उमलू द्यायचंय. राष्ट्रीय बालिकादिनाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया !
= = =

अभिमान ! मतदार असल्याचा. . .


लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणाऱ्या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असं महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. ही एकप्रकारे  आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा आणि ज्या ज्या स्तरावर म्हणजे विधानसभा-लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या ज्या वेळी होतात तेव्हा आपला हा मौल्यवान अधिकार बजावायला हवा.
            राज्याचे मुख्य निवडणुक  अधिकारी कार्यालय 25 जानेवारी 2012 ला दुसरा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करते आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचा मुलभूत अधिकार बजावण्याचे आवाहन करणारी, जन प्रबोधन करणारी प्रत्येक बाब लक्षवेधी ठरणार आहे.
            निवडणूका आल्या की मतदारयादीत नाव नसणं, नावात- रहिवाशी पत्त्यात चुका असणं किंवा बदल     झालेला असणं, छायाचित्र ओळखपत्र नसणं यासारख्या अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्यासाठी मतदार म्हणून आपण स्वत: किती दक्ष असतो, आपल्या नावातील- पत्त्यातील बदल, सुधारणा करून घेण्यास आपण किती प्रयत्न करतो हे समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण पात्र असताना मतदानाचा हक्क बजावणं ही.  जी व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण करते त्या व्यक्तीला मतदानाचा मुलभूत हक्क प्राप्त झाला आहे. पण या मुलभूत हक्काची आपण कितीजण अंमलबजावणी करतो ? हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. मतदानाच्या टक्केवारीवरून हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
            आपल मत- आपला हक्क - आपलं मतदान केंद्र याबाबतीत जागरूक राहताना मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं, मतदानाचा मुलभूत अधिकार बजावावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासीनता मनातून काढून टाकावी यासाठी विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जात असते.
            तरूणांना आपण देशाचा आधारस्तंभ मानतो. याच आधारस्तंभाने पुढे येऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं, समृद्ध, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक वर्षी 25 जानेवारी  हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.  लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिला आणि युवकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे, त्यांनी पुढे येऊन निर्भयपणे आपला मतदानाचा आणि घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करावा या उद्देशाने या कार्यक्रमात महिला आणि युवकांना समोर ठेऊन विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
            दि. 25 जानेवारी 2012 रोजी नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर हॉलमध्ये सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या राज्य स्तरीय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव
थँक्सी थेकेकरा, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वंदना कृष्णा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
            राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यादृष्टीने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.  मतदार असल्याचा अभिमान- मतदानासाठी सज्ज, जागृत मतदार, समृद्ध लोकशाहीचा आधार, तुमचे मत- तुमची निर्णयशक्ती, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा सहभाग अशा प्रोत्साहनात्मक स्वरूपात मोहीम राबविण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्याबद्दल, सहभागी होण्याबद्दल आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विविध प्रसार माध्यमांचा उपयोगही करून घेण्यात आला आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांना त्यांनी त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी एक विशेष मोहीम देखील या निमित्ताने हाती  घेण्यात आली आहे. 
            ज्या मतदाराचा जन्मदिनांक 1 जानेवारी 1992 ते 1 जानेवारी 1994 या दरम्यान आहे,  अशा 18 ते 19  या वयोगटातील मतदारांना, त्यांचे नाव मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची  विशेष संधी यानिमित्ताने मिळणार असून त्यासाठी त्याने  मतदार नोंदणीचा नमुना अर्ज क्रमांक 6,  रंगीत छायाचित्रासह मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी यांच्या कार्यालयात द्यावयाचा आहे.  ज्या पात्र तरुण नागरिकांनी  अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले नसेल त्यांनी त्वरित मतदार नोंदणी करावी  आणि दि. 25 जानेवारी 2012 या ‘¸üÖ™ÒüßµÖ मतदार פü¾ÖÃÖ’ कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन ही या निमित्ताने करण्यात आले आहे.
            राज्यात  आजमितीस एकूण 7 कोटी, 87 लाख, 21 हजार 472 नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये 4 कोटी 14 लाख, 75 हजार 360 एवढे पुरुष तर 3 कोटी 72 लाख, 45 हजार 842 महिला मतदार आहेत. यापैकी   82.34 टक्के मतदारांना त्यांचे छायाचित्र ओळखपत्र वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
            राज्यात नव्याने सुमारे 19 लाख मतदारांची नाव नोंदणी झाली आहे. नव्याने नोंदणी झालेल्या 18 ते 19 वयोगटातील 5 लाख 50 हजार 386 युवक-युवतीना छायाचित्र ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला  वाटपाचे काम  प्रत्येक मतदान केंद्रावर केले जाणार आहे. यामध्ये 3 लाख 62 हजार 114 पुरुष तर 1 लाख 88 हजार 272 महिला मतदाराचा समावेश आहे.त्याचप्रमाणे नव्याने नोंदणी झालेल्या 20 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या एकूण 13 लाख 50 हजार 588 इतकी आहे. त्यांनाही यावेळी फोटो ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला वाटप केले जाणार आहे. यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 47 हजार 043 तर महिला मतदार 6 लाख 03 हजार 545 इतक्या आहेत.
             दि. 25 जानेवारी 2012 रोजी एस. एन. डी. टी. महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात 20 युवतींना प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र मतदार ओळखपत्र व मतदार दिन बिल्ला  सन्मानपूर्वक वितरित केला जाणार आहे.
मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी विकसित केलेल्या http://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरही  निवडणूक प्रक्रियेसंबंधीची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून हे अर्ज भरुन ते संबंधित मतदारसंघातील यादीत नोंदविण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी, यांच्या कार्यालयात नेऊन देता येतील.
            राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आपण मतदार असल्याचा अभिमान बाळगून मतदानासाठी सज्ज राहतांना सुदृढ आणि सशक्त लोकशाही च्या निर्मितीमधील आपला सहभाग अधिक बळकट करुया.