शनिवार, ४ जुलै, २०१५

जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहीम -उप निबंधक किशन रत्नाळे

धुळे, दि. 4 :-मुख्यालय असलेल्या सर्व राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व सहकारी संस्थांचे दि. 1 जुलै पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.  त्यानुसार धुळे जिल्हा सहकार खात्याचे प्रशासन व लेखापरिक्षण विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  सर्व सहकारी संस्थांनी संस्थेचे सर्वेक्षण विशेष मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन धुळे तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            तरी जिल्ह्यातील धुळे मुख्यालय असलेल्या सर्व राज्य, विभाग, जिल्हा तसेच तालुक्यातील सर्व संस्थाचे सर्वेक्षण कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी सहकार्य करावे.  ज्या सहकारी संस्थांनी कामकाजास सुरवात केलेली नाही, काम करण्याचे बंद केलेले आहे, रूपये 500 पेक्षा अधिक नाही इतक्या किंमतीचे भाग किंवा सदस्यांच्या अनामत रक्कम संस्थेच्या ताब्यात आहेत, संस्थेचा पत्ता व ठावठिकाणा नाही, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 व 97 घटना दुरूस्ती प्रमाणे अधिनियमातील किंवा नियमातील किंवा उपविधीती नोंदणी व व्यवस्थापन बाबतच्या कोणत्याही शर्तीचे पालन करणे बंद केलेल्या अशा संस्था अवसायनात घेण्यात येऊन त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल, याची संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000

सहाय्यक (पूर्व) परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कलम 144 (2 ) चे मनाई आदेश जारी

    धुळे, दि. 4 :-रविवार दि.  5 जुलै, 2015  रोजी सकाळी 10-30 ते  दुपारी 12-00 वाजेपर्यंत  महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत सहाय्यक (पूर्व) परीक्षा-2015  या पदासाठी धुळे येथील जे. आर. सिटी हायस्कूल, धुळे, छत्रपती शिवाजी हायस्कूल, धुळे,  कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, धुळे भाग-अ, कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, धुळे भाग-ब  या  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कुणीही गर्दी, गोंधळ निर्माण करू नये या उद्देशाने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने धुळे भागाचे उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी धुळे शहरातील वरील परीक्षा केद्राच्या आवारापासून 200 मीटर अंतरापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) चे मनाई आदेश  दि. 5 जुलै, 2015 रोजी सकाळी 10-30 ते दुपारी  12-00 वाजेपावेतो परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू केले आहेत.
             या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षार्थी शिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही, कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक दुखापती, इजा होईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेता येणार नाही, परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स फॅक्स, ई मेल, इंटरनेट सुविधा केंद्रे बंद राहतील, परीक्षार्थींना मोबाईल, पेजर, गणकयंत्र इ. चा वापर सदर परीक्षा केंद्राच्या परिसरात करता येणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

औद्योगिक प्रयोजनाला चालना देण्यासाठी औद्योगिक अकृषिक वापर साह्यभूत समिती गठीत -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख

धुळे, दि. 4 :- खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सुलभ करण्याकरिता उद्योजकास आवश्यक अधिकृत माहिती विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून एक खिडकी संरचनेंतर्गत एकत्रित रित्या उपलब्ध होण्याकरिता जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वापर साह्यभूत समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.
            औद्योगिक अकृषिक वापर साह्यभूत समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स्वप्नील लिंगडे, नगर रचनाकार विभागाचे नगर रचनाकार बी. एल. वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एल. बरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता सी. के. वाणी, उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ, धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे  कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे, पाटबंधारे उपविभाग क्र.2 चे उप अभियंता जे. बी. माळी  आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्यामध्ये गुंतवणुकीच्या प्रमाणामध्ये वाढ करणे व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मेक इन महाराष्ट्र हे अभियान हाती घेण्यात आले आहे.  या अभियानाच्या अनुषंगाने राज्यात उद्योगांना वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक घटकांची कारण मिमांसा करून विविध स्तरावर होणारा विलंब टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना शासन करत आहे.  त्यासाठी शासनाने नुकतीच जिल्हास्तरावर औद्योगिक अकृषिक वापर साह्यभूत समिती स्थापन केली असून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला उप मुख्य कार्यकारी दर्जाचा अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, नगर रचना जिल्हा शाखा कार्यालयाचे सहाय्यक संचालक, जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जलसंधारण विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, महापारेषण व महावितरण या कंपन्यांचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, उप वनसंरक्षक  हे सदस्य राहतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील.
            या समितीची बैठक प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा अथवा आवश्यकतेनुसार अधिक वेळा अध्यक्षांच्या द्वारे पूर्व नियोजित वेळेत घेण्यात येईल.  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 अ नुसार औद्योगिक अकृषिक वापर करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी ज्या-ज्या विषयाबाबत माहिती आवश्यक असेल त्याचा उल्लेख करून सदस्य सचिवांकडे अर्ज सादर करावेत.
000000


अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र कार्यान्वित होणार राज्याच्या विकासयात्रेत अमेरिकेतील मराठी बांधवांनी योगदान द्यावे- मुख्यमंत्री

मुंबई,दि.4 :महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून त्यात अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजविलेल्यामराठी मंडळींनी योगदान दिल्यास महाराष्ट्र हे एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल, असे आवाहनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉस एन्जेलिस (अमेरिका) येथे केले. अमेरिकेतील मराठी बांधवांशी महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे 17 वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ पदाधिकारी शैलेश शेट्ये, विवेक रणदिवे आदीउपस्थित होते.
अमेरिकेतील मराठी मंडळींनी केलेल्या प्रगतीची विशेष प्रशंसा करुन मुख्यमंत्री म्हणाले, परकीय भूमीवर कर्तबगारी गाजविण्याचे मोठे काम करणाऱ्या महाराष्ट्राच्यासुपुत्रांबद्दल राज्याला आनंद, समाधान आणि अभिमान वाटतो. अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा लक्षणीय वाटा आहे. कर्तृत्व गाजविण्यासोबतच येथील मराठी माणसाच्या या पिढीने आपले मराठीपण निष्ठने जोपासले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून राज्य आता वेगाने बदलत असल्याची माहिती या अधिवेशनातील मराठीजनांना देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेक इन इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मेक इन महाराष्ट्र आवश्यक आहे, कारणमहाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. मेक इन महाराष्ट्र हा आमचा केवळ एक नारा नाही, तर ती एक व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे, ते देण्याचे काम आमचे सरकार करत आहे. राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तनहोत असून रेड टेपऐवजी रेड कार्पेटसंस्कृती आम्ही प्रस्थापित करीत आहोत.औद्योगिक क्षेत्रातील परवानाराज आम्ही संपुष्टात आणले आहे. यासोबत जलयुक्त शिवार अभियानासारख्या कार्यक्रमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. या विकासयात्रेत मराठी मंडळींनी सहभागी व्हावे. त्यांच्या योगदानातून महाराष्ट्र एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मातृभूमी, कर्मभूमी आणि जन्मभूमी यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा असे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र आणि अमेरिका जोडण्याचा प्रयत्न येथील मराठी मंडळींच्या माध्यमातून केला जाईल. त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र निश्चितपणे कार्यान्वित करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून अमेरिकेतील मराठी मंडळींचा महाराष्ट्राशी असलेला समन्वय-संवाद प्रभावीपणे विकसित केला जाईल. यासोबतच बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि प्रस्तावित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनासाठी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 25 टक्के सवलत दिली जाईल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र अनलिमिटेड या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. या तीन दिवशीय अधिवेशनात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत आहेत. अधिवेशनानिमित्त आयोजित या आनंदोत्सवात सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, आर्थिक आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांसाठी व्यावसायिक चर्चासत्रेही होणार आहेत. मैत्र पिढ्यांचेही या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अमेरिका आणि कॅनडातील 54 मराठी मंडळांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.या अधिवेशनास अमेरिका आणि कॅनडात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींचा मोठा प्रतिसाद लाभत असूनजवळपास पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली.

-----०-----