गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

महाराष्ट्र अमुचा डिरेक्टरीचे मुख्य सचिवांच्या हस्ते प्रकाशन


मुंबई, दि. 18 : राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र            अमुचा-डिरेक्टरी 2012 चे प्रकाशन मुख्‍य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
            यावेळी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे, राज्य संघटक रमेश जंजाळ, संघटन सचिव समीर भाटकर, उपाध्यक्ष राजेश गायकवाड हे उपस्थित होते.
            शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांपासून ते जनसामान्यांपर्यंत अशा सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असलेल्या या डिरेक्टरीचे मुख्य सचिवांनी कौतुक केले. ते म्हणाले, राजपत्रित अधिकारी महासंघ नेहमीच विधायक कामे करीत आलेले आहे. महाराष्ट्र अमुचा डिरेक्टरी ची निर्मिती हासुद्धा एक स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम असाच पुढे सुरु राहावा यासाठी श्री.गायकवाड यांनी महासंघास शुभेच्छा दिल्या.
            148 पृष्ठांच्या या डिरेक्टरीमध्ये राज्याचे मंत्रिमंडळ, विविध कार्यालये, कार्यालय प्रमुख, जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे अधिकारी, शासकीय विश्राम गृहे, केंद्र शासनाची महत्त्वाची कार्यालये, प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक याबरोबरच वर्ष 2012 मधील शासकीय सुट्टया, रेल्वे वेळापत्रक, राज्य शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे, कार्यसंस्कृती अभियान, महासंघाचे पदाधिकारी, संलग्न संघटना आदी विषयांबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
            सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असलेल्या या डिरेक्टरी 2012 ला सर्वच स्तरातून मोठया प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महासंघाचे सरचिटणीस श्री. कुलथे यांनी व्यक्त केला. आणि महासंघाकडून अशाच प्रकारचे उपक्रम पुढेही सुरु राहतील असेही त्यांनी सांगितले.
            या डिरेक्टरीची किंमत रु. 120 असून ही नवीन प्रशासकीय भवनाच्या तळमजला येथील महासंघाच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
000

रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर 1153 गावात हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी


मुंबई, दि. 18 : राज्यातील रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार नाशिक विभागातील 367, औरंगाबाद विभागातील 116 आणि पुणे विभागातील 670 अशा एकूण 1153 गावांमध्ये हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. नागपूर आणि अमरावती या विभागांची पैसेवारी नंतर जाहीर होणार आहे.  राज्यात एकूण 7 जिल्ह्यांमधील 806 गावे वाड्यांमध्ये 140 टँकर्समधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
            राज्यातील टंचाई सदृश परिस्थिती, पिण्याच्या पाणी पुरवठ्याची स्थिती, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमधील पाण्याच्या साठ्याची स्थिती, तसेच रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
            कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक विभागात 1130, औरंगाबाद विभागात 23 आणि पुणे विभागात 614 मिळून एकूण 1767 गावांमधील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. अमरावती नागपूर विभागातील अंतिम पैसेवारी लवकरच जाहीर होणार आहे. शासनाच्या स्थायी निर्देशानुसार ज्या गावांमधील अंतिम पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा गावांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रुपांतरण, वीज बिलात एक तृतियांश सूट, परीक्षा शुल्कात माफी, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती आणि बाधीत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडि करणे आदी सवलती देण्यात येतात. 
            राज्यात पुणे नाशिक विभागातील 16 तालुक्यांमधील 1124 आणि गोंदिया जिल्ह्यातील 47 अशा एकूण 1171 गावांमध्ये टंचाई सदृश परिस्थिती यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.  या गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करणे, टँकरने पाणी पुरविणे, चारा डेपो उघडणे आदी सवलती देण्यात आलेल्या आहेत. चारा डेपो उघडण्याचे सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहेत.
            राज्यात रोजगार हमी योजनेची एकूण 39,910 कामे सुरु असून त्यावर 4 लाख 34 हजार 304 मजूर काम करीत आहेत. राज्यातील मोठ्या, मध्यम लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलाशयांच्या उपयुक्त पाणी साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली.
----0----

प्रजासत्ताक दिनी सकाळी 9.15वाजता राज्यभर ध्वजारोहण


मुंबई, दि. 18 : 26 जानेवारी 2012 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.15 वाजता करण्यात यावा. या दिवशी राज्यात सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्हयांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
            जास्तीत जास्त व्यक्तींना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे याकरिता सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावासा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी     8.30 च्या पूर्वी किंवा 10 च्या नंतर करावा, असेही शासनाने सूचित केले आहे.
            या निमित्त आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे देशभक्तीवर आणि शहीदांच्या स्मृतीसाठी असावेत.                                     
----