मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

दहावी व बारावी परीक्षेच्या शिक्षासूचीच्या प्रारुपावर 20 जानेवारीपर्यंत अभिप्राय पाठवा


मुंबई,‍िद. 16 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेसाठीच्या प्रचलित शिक्षासूचीचे अद्ययावत प्रारुप मंडळाच्या www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिक्षासूचीचा प्रभावीपणे व सकारात्मक परिणाम होण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विविध संघटना, विद्यार्थी, पालक यांच्याकडून अभिप्राय मागविले आहेत.
            सर्व संबंधितांनी आपले अभिप्राय मंडळाच्या संकेतस्थळावर अथवा विभागीय मंडळ कार्यालयाकडे लेखीस्वरुपात  20 जानेवारी 2012 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभाग, वाशी, नवी मुंबई यांनी केले आहे.
            मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेपूर्वी, परीक्षेच्या वेळी व परीक्षेनंतरच्या काळात काही विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच समाजातील अनेक घटकांकडून विविध प्रकारचे गैरप्रकार होत असतात. प्रत्येक गैरप्रकाराच्या स्वरुपानुसार मंडळस्तरावर चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येते आणि दोषींवर प्रचलित शिक्षासूचीनुसार शिक्षा करण्यात येते.
            ऑक्टोबर, 2004 पासून परीक्षा पद्धतीमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. बारकोड पद्धतीचा अवलंब करण्यात आला. परीक्षापद्धतीतही बदल करण्यात आला. त्याचप्रमाणे गैरप्रकारांच्या स्वरुपातही बदल झालेला आहे. त्या अनुषंगाने प्रचलित शिक्षासूचीमध्ये आमुलाग्र बदल करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी उपसमितीने सांगोपांग विचार करुन शिक्षासूचीचा अद्ययावत मसुदा तयार केला आहे. 
000

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आज उद्घाटन


मुंबई,‍िद. 16 : कला संचालनालयाच्या 52 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) 2011-12 चे उद्घाटन उद्या मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांच्या हस्ते होणार आहे.
        ठाणे कला भवन, जुना मुंबई-आग्रा रोड, कापूरबावडी जंक्शनजवळ ठाणे येथे होणाऱ्या या उद्‌घाटन समारंभास ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अभय वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
        हे प्रदर्शन दिनांक 17 ते 22 जानेवारी, 2012 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याचे कला संचालनालयाचे प्रभारी कला संचालक जी. बी. धनोकार यांनी कळविले आहे.
000

पर्यावरण संरक्षणासाठी तेल आणि गॅस बचतीची गरज --डॉ. अश्विनी जोशी


मुंबई, दि. 16 : पृथ्वीवरील वातावरणात झालेला बदल लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी तेल आणि गॅस यांची बचत करण्याची गरज असल्याचे नियंत्रक शिधावाटप तथा संचालक, नागरी पुरवठा डॉ. अश्विनी जोशी यांनी आज येथे सांगितले.
            पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ऑरगनायझेशन व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ते 31 जानेवारी 2012 पर्यंत तेल आणि गॅस बचत पंधरवडा साजरा करण्यात येतो. या पंधरवड्याचे उद्घाटन येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले त्यावेळी डॉ. जोशी बोलत होत्या. पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ऑरगनायझेशनचे संचालक  टी. बक्षी, गेलचे के. टंडन,  तसेच बी. जे. परमार, परमिंदर सिंग आदी तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, तेल कपंन्याचे वितरक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
            डॉ.जोशी म्हणाल्या की,  ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जा तसेच सोलर कुकर, बायोगॅस आदींच्या वापरा संबंधी प्रसार करुन या बाबतच्या तांत्रिक शिक्षणासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.
            यावेळी उपस्थितांना तेल आणि गॅस वाचविण्याबाबतची शपथ देण्यात आली. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. या संदेशात श्री. देशमुख म्हणतात की, भारताला परदेशातून पेट्रोलजन्य पदार्थ आयात करावे लागतात आणि याचा थेट परिणाम आपले परकीय चलन कमी होण्यावर होत असतो. त्यामुळे पेट्रोलजन्य पदार्थांची बचत करणे हे आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे आणि ऊर्जेची बचत ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनला असून हा बचतीचा साठा उद्यासाठी आणि भावी पिढीसाठी फार गरजेचा आहे.
            तेल कंपन्यांच्यावतीने या पंधरवड्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप यावेळी करण्यात आले.
000

ग्रंथ निवडीबाबत 21 जानेवारीपर्यंत आक्षेप पाठवावेत


मुंबई, दि. 16 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथभेट योजना कार्यान्वित आहे.
          37 व्या ग्रंथसंच भेट योजनेंतर्गत 2010 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी खरेदी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या 424 ग्रंथांची (मराठी-345, हिंदी-39 व इंग्रजी-40) यादी संचालनालयाच्या www.dolmaharashtra.org.in व शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेत स्थळांवर  दिनांक 21 जानेवारी 2012 पर्यंत अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे.
          या संदर्भ यादीतील कोणताही ग्रंथ आक्षेपार्ह असल्यास ते आक्षेप दिनांक 21 जानेवारी 2012 पर्यंत संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई यांच्याकडे लेखी स्वरुपात, हस्त बटवडयाने, पोस्टाने अथवा कुरिअरने कार्यालयीन वेळेत पाठवावेत. या मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
0 0 0 0

ए.पी.एल. शिधापत्रिकाधारकांसाठी जानेवारी महिन्याचे अन्नधान्य परिमाण


मुंबई, दि. 16 : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात ए. पी. एल. योजनेकरिता माहे जानेवारी 2012 साठी 22,108 मेट्रिक टन गहू व 3,622 मेट्रिक टन तांदूळ इतके नियमित नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच गव्हाचे 11,457 मेट्रिक टन इतके अतिरिक्त नियतन मंजूर करण्यात आले आहे.
            ए. पी. एल. शिधापत्रिका धारकास एकूण 15 किलो धान्य वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये त्यांना 10 किलो गहू व 5 किलो तांदूळ घेता येईल. एपीएल योजनेंतर्ग जानेवारी 2012 करिता परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त मागणीनुसार नियमित गहू नियतनाचे परिमंडळनिहाय वाटप करण्यात येत असून ए. पी. एल. योजनेंतर्गत जानेवारी 2012 करिता प्राप्त तांदूळ नियतन हे परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त मागणीच्या 29.48 टक्के इतके असल्याने त्याच्या मागणीच्या याच टक्केवारीनुसार परिमंडळनिहाय वाटप करण्यात येणार आहे. गरजू व पात्र शिधापत्रिकाधारक योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत व अधिकृत शिधावाटप दुकाने कोरडी राहणार नाहीत याची दक्षता उपनियंत्रक शिधावाटप यांनी घ्यावी, अशी सूचना नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केली आहे.
            सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना विहित वेळेत अन्नधान्य पोहचण्याच्या दृष्टीकोनातून सदर योजनेचे माहे जानेवारी 2012 करिताचे वितरण आदेश उपनियंत्रकांनी त्वरित द्यावेत आणि संलग्न संस्थांनीही या योजनेतील अन्नधान्याची 20 जानेवारी 2012 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत 100 टक्के उचल करावी.
            गोदामातून उचल केलेले अन्नधान्य विहित मुदतीत सर्व संबंधित शिधापत्रिकाधारकांना पोहचेल यासाठी सर्व परिमंडळ उपनियंत्रक शिधावाटप यांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी.
            अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू व तांदूळ स्वीकारताना शासनाच्या निर्देशानुसार संयुक्तपणे नमुने घेऊन धान्याचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच धान्याची उचल करावी. अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी अन्नधान्याची मागणी न नोंदविल्यास अथवा संघटीत संस्थांनी मुदतीत 100 टक्के धान्याची उचल न केल्यास त्यांच्या विरुध्द नियमानुसार कारवाई करावी. तसेच शिधापत्रिकाधारकास अधिकृत शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सदर धान्याचे वाटप होत असल्याची खात्री करावी व अधिकृत शिधावाटप दुकानांच्या नियमाप्रमाणे तपासण्या कराव्यात अशा सूचना नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी सर्व परिमंडळातील उपनियंत्रक शिधावाटप यांना दिल्या आहेत.
0 0 0 0