सोमवार, १५ जून, २०१५

जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस









धुळे, दि. 15 : राज्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे पारदर्शकपणे सुरू असून काम शास्त्रीय पध्दतीने माथा ते पायथा सुरू आहे. यामुळे पाणी पातळी वाढेल. जलयुक्त शिवार अभियानातूनच सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होईल. राज्यात जलयुक्त शिवार योजनेची 93 हजार कामे सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, जळगावचे खासदार ए. टी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सरलाताई पाटील, महापौर जयश्री अहिरराव, आमदार सर्वश्री अनिल गोटे, जयकुमार रावल, अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, शिरीष चौधरी, मुख्यमंत्री सचिवालयातील सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील सर्व जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाले, तरी त्यातून 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येवू शकते. उर्वरित 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करावे लागतील. जलसंधारण व मृदसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा विकास होवू शकतो. त्यासाठी राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचे स्ट्रक्चरल मॅपिंग करावे, अशी सूचना त्यांनी केली.
कमी वेळेत जास्त पाणी कसे उपलब्ध होईल याचा विचार झाला पाहिजे. जुनी कामे शोधून त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष दिले पाहिजे. त्यातून कमी वेळेत जास्त पाणी उपलब्ध होवू शकेल. पुढील वर्षी 25 टक्के निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देवू. पुढील वर्षाचा आराखडा तयार करताना त्या परिसरातील जलस्त्रोतांचा एकत्रित विचार झाला पाहिजे. त्यातून नद्याही वाहत्या होतील. सर्व विभागांच्या समन्वयामुळे या योजनेची कामे चांगली झाली असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.
सिमेंट बांध, तलावाच्या बाजूला जमिनीची धूप थांबविण्यासाठी वृक्षारोपण करावे. हे अभियान जनतेचाच कार्यक्रम आहे.  लोकप्रतिनिधी व नागरिकांचा वाढता सहभाग ही आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी हा उपक्रम हाती घेणे ही अभिनंदनीय बाब आहे. शिरपूर पॅटर्नबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पॅटर्न  पुढे आले. आपापल्या भागातील पॅटर्ननुसार सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जेणेकरुन पुढील दोन वर्षात आपल्या भागातील दुष्काळ नाहीसा झाला पाहिजे. राज्यात सुरू असलेल्या 93 हजार कामांची नोंद संकेतस्थळावर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठे काम झाले आहे याची तत्काळ माहिती मिळू शकेल.
काही बँका अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना दिसत नाहीत. याबाबत लिड बँकेला सांगितले आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा. जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयकृत, व्यावसायिक बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणार नाहीत, शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत, अशा बँकांच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले. आमदार पटेल, महापौर अहिरराव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पॉवर पाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील एकूण 129 गावांची निवड करण्यात आली आहे. एकूण मंजूर कामांपैकी 1 हजार 261 कामे पूर्ण झाली आहेत. लोकसहभाग, प्रतिसाद चांगला मिळत असून, गाळ काढणे, नाला खोलीकरण आदी कामे सुरू आहेत. याशिवाय कंपार्टमेंट बंडिंग, ओघळ नियंत्रण, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध दुरुस्ती, शेततळे, विहीर पुनर्भरण, वन तलाव, नाला सरळीकरण, नाला बांध दुरुस्ती, जामखेली नदी पुनर्रजीवन आदी कामे सुरू आहेत. या कामांच्या मूल्य मापनासाठी वेगवेळ्या संस्थांची मदत घेण्यात आली असून, त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्याचा वार्षिक ऋण आराखडा 1,643 कोटी रुपयांचा असून, आतापर्यंत 271 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे, असेही जिल्हाधिकारी मिसाळ यांनी नमूद केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

        जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची पाहणी

        तत्पूर्वी मा. मुख्यमंत्री महोदयांनी धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत केलेल्या कामांची पाहणी  केली.  त्यात पुरमेपाडा ता. धुळे येथील वन विभागाने केलेल्या सलग समतल चर, ओघळ नियंत्रण कामाची पाहणी करून वन विभागातर्फे पुरमेपाडा परिसरात करावयाच्या 1 लक्ष 67 हजार वृक्षारोपणाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदखेडा तालुक्यात हातनूर येथील नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण या कृषि विभागाने केलेल्या कामांची पाहणी केली.  त्याच बरोबर विखरण येथील जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने केलेल्या तलावातील गाळ काढणे, जोगशेलू येथील देशबंधू मंजू गुप्ता फाऊंडेशन तर्फे करण्यात आलेल्या जुन्या जलसंधारण कामांची दुरूस्ती व नाला खोलीकरण कामांची पाहणी केली.
            जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करतांना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री तथा  सहकार राज्यमंत्री  दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे (धुळे), धुळे वन विभागाचे उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, शिवसेना शहर प्रमुख सतीष महाले, प्रदीप कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

00000