बुधवार, ३ जून, २०१५

लळींग कुरणात लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीवन उभे करणार : जिल्हाधिकारी लळींग कुरणात वृक्षारोपण करून पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ

धुळे, दि. 3 :- लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी लळींग कुरणामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीवन उभे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.  त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते लळींग कुरणामध्ये वृक्षारोपण करून सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.  त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी उपवनसंरक्षक  डी. यु. पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनणे (धुळे), उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, लळींगचे माजी उपसरपंच संभाजी गवळी, उपसरपंच गोविंद गवळी, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, निवासी नायब तहसिलदार अरूण शेवाळे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर एस. एम. पाटील, प्रदीप शिरोडे, शरद गढरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांचे राज्यासाठीचे व देशासाठीचे योगदान विचारात घेता त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी 3 ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या पर्यावरण सप्ताहामध्ये संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम मनरेगा अंतर्गत हाती घेण्यात आला असून यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या गावात वृक्षारोपण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.   वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम प्राथमिक, माध्यमिक शाळा, आंगणवाडया, आरोग्य केंद्रे, समाज मंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या जमिनी, शासकीय व निमशासकीय कार्यालये व रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

000000

शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते योग्य दरात उपलब्ध करा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 2 :-शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात, योग्य दरात आणि योग्य वेळी बी-बियाणे, खते

उपलब्ध करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खताची आढावा बैठक आयोजित

करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा

परिषदेचे कृषि विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, धुळे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर एस. जे.

महाजन, पंचायत समिती कृषि अधिकारी आर. एस. चौधरी (धुळे), ए. एन. कौर (शिरपूर), जिल्हा

मार्केटिंग अधिकारी बी. आर. प्रबोधनकार, आर.सी.एफ. चे विजय बाविस्कर,  विशाल नवले,

पुरवठादार, कंपनी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सहकारी सोसायटया मार्फत बांधावर खते उपलब्ध  करण्यासाठी कृषि

विभागाची महत्वाची भूमिका असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की,

दरमहा सप्टेंबर पर्यंत खतांचा व्यवस्थित पुरवठा नियोजन बध्द पध्दतीने करण्यात यावा. खतांचा

काळाबाजार व  गैरप्रकार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील,  खेडयापाडयातून खत

पुरवठा करण्याची व्यवस्था उत्पादक कंपन्यांनी करावी, जेणे करून शेतकऱ्यांना सहज व

जवळच्या ठिकाणी  खते उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, धुळे हा कृषि प्रधान जिल्हा

आहे.  बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे  सहज

उपलब्ध झाली पाहिजेत.   खत पुरवठादार व उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक भागात

व्यवस्थीत खत पुरवठा करावा.  सोसायटयामार्फत व शेतकरी संघा मार्फत खत पुरवठा केल्यास

त्यात पारदर्शकता राहू शकते.  शेतकऱ्याला जे खत पाहिजे तेच खत दिले पाहिजे, असेही त्यांनी

यावेळी सांगितले.

धुळे जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा आहेत.  या सीमेवरून बनावट खते येण्याची

शक्यता आहे.  या बनावट खतांमुळे शेतकऱ्यांची मोठया प्रमाणावर फसवणूक करण्यात येते

त्यामुळे यंत्रणांनी दक्ष राहून बनावट खत जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.

बनावट खत विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी

सांगितले.

गोंदूर गावाच्या विकासासाठी परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 2 :-गोंदूर गावाच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास आराखडा तयार करून यंत्रणा प्रमुखांनी विकास कामांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  केले.
            सांसद आदर्शग्राम जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, यशदाचे सोनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे, गट विकास अधिकारी जी. ए. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, सरपंच सखाराम पाटील, आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, यंत्रणांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून कामांना सुरूवात करावी.  आदर्श गाव म्हणजे त्या गावाचा परिपूर्ण विकास होईल अशा पध्दतीने केलेले काम होय.  गावांच्या मागणी प्रमाणे विकास आराखडा तयार करणे आवश्यक असून निधीच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रकल्प परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.  गोंदूर गावची ऑक्टोबर-2016 पर्यंत विकास कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            यावेळी सांसद आदर्श ग्राम गोंदूर गावातील विकास आराखडयाचा आढावा घेण्यात आला.  त्यात नवीन प्रस्तावित करण्यात आल्यानुसार गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पी.व्ही.सी. पाईप गटार करणे व सांडपाणी अंतिम व्यवस्था करणे, गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी गावातील मुख्य चौकात कचरा कुंडया ठेवणे व कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करणे, गावात संपूर्ण दारूबंदी करणे,  पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र व पाईपलाईन करणे, गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण केल्याने गावात चिखल होणार नाही परिणामी स्वच्छता राखली जाईल व आरोग्याची समस्या भेडसावणार नाही  आणि वाहतूक सुखकर होईल, गाव शिवारातील रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे, संपूर्ण गाव खडकावर वसल्यामुळे वैयक्तिक शौचालयाला अडचण निर्माण होते.  त्यामुळे इतर कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालय बांधल्याने गाव निर्मल होण्यास मदत होईल, गावाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग दिसून येत नाही.  महिलांचा सहभाग वाढल्याने गाव विकासाला चालना मिळेल, लोंढानाल्यावर सिमेंट  बांध बांधल्याने परिसरातील जमिन ओलिताखाली येण्यास मदत होईल व बागायती क्षेत्रात वाढ होईल, लोंढानाल्यावरील जुन्या सिमेंट नालाबांधाचा गाळ काढून खोलीकरण केल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल व शिवारातील विहीरींना त्याचा लाभ होईल, गावातील शिवारातील विजवाहक तारा जिर्ण झाल्यामुळे गावात व शिवारात विजेची समस्या निर्माण होते तारा बदलल्यामुळे शेतीला वीज पुरवठा होऊन शेती बागायतीला चालना मिळेल, ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांची शिक्षणाची आवड निर्माण होईल व अध्ययन ग्रहण क्षमतेत वाढ होईल परिणामी गुणवत्ता विकास साध्य होईल, गावातील स्त्री भ्रृण हत्येला प्रतिबंध केल्याने समाजातील मुलींचे प्रमाण वाढेल, युवकांना व्यायामाच्या सवयी निर्माण होऊन ते शारिरीकदृष्टया सक्षम होतील, गावात महिला व पुरूषांचे गट निर्माण केल्याने गावात संघटन व एकता निर्माण होईल, गावालगतच्या नाल्यामुळे गावात दुर्गंधी पसरते त्यामुळे नाला खोलीकरण करून बंदिस्त झाल्याने गावाच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटेल व स्वच्छता राहील.

00000000 

शेतक-यांना प्राधान्याने खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन द्या :- जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे दि.11 :- खरीप हंगाम 2015-2016 साठी शेतक-यांना पीक कर्ज प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
     खरीप पीक कर्ज 2015-16 चा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील बॅकर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर एस.एस.ईखारे,नाबार्डचे अरविंद बोरसे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ज्ञानेश्वर बुथ,कृषी उपसंचालक प्रमोद वानखेडकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, एचडीएफसी बँकेचे राजकुमार शाह, स्टेट बँक ऑफ हेद्राबादचे संदीप महापात्रा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव,पंजाब नॅशनल बँकेचे ए.एन.ब्राम्हणकर,आयसीआयसीआय बँकेचे एस.आर.देवाणकर, सिंडीकेट बँकेचे वाय.एस.भट, बँक ऑफ इंडियाचे गणेश पाटील,अलाहाबाद बँकेचे भैरव प्रसाद, आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की,धुळे जिल्हयातील जास्तीत जास्त कुटूंबे ही शेतीवर अवलंबून आहेत.हे शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करुन त्याच बरोबर नगदी पीके घेवून आपला आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामासाठी बँकानी सहज पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे असेही,यावेळी जिल्हाधिका-यानी सांगितले.
     पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की,मागील काही वर्षापासून जिल्हयात अतिवृष्टी,गारपीटीमुळे शेतक-यांचे हाताशी आलेल्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे मागील हंगामात शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज अनेक शेतकरी फेडू शकलेले नाहीत.बँकांनी अशा शेतक-यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करुन त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे,असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले की,कुठल्याही परीस्थितीत जिल्हयातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये याची दक्षता बँकांनी घ्यावी असेही जिल्हाधिकारी मिसाळ यांनी सांगितले.
जिल्हयात दुग्धव्यवसायाला चालना देण्याची गरज

     धुळे जिल्हा हा पारंपरिक पध्दतीने दुग्धव्यवसाय करणारा जिल्हा आहे.जिल्हयात मोठया प्रमाणावर दुभत्या जनावराचे प्रमाण आहे.दुग्ध व्यवसाय हा संघटीतपणे करुन जिल्हातील दुधाचे उत्पादन वाढविण्याची व दुधाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारीनी याच बैठकीत सांगितले.
     जिल्हयातील शेतक-यांनी व दुध उत्पादकांनी संकरीत जनावराच्या माध्यामातून दुध उत्पादन वाढून आपला व आपल्या कुटूंबाचा आर्थिक विकास करावा.असेही जिल्हाधिकारानी या बैठकीत सांगितले. 

000000