मंगळवार, २१ जुलै, २०१५

विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ शालेय पोषण आहार योजनेची बैठक संपन्न

           धुळे, दि. 21 :- विद्यार्थ्यांची शैक्षणिक उपस्थिती जास्ती-जास्त रहावी यासाठी विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.  ज्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे.  त्या शाळांवर लक्ष ठेवणे, शालेय समितीच्या वारंवार बैठका घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शालेय पोषण आहार योजनेची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले,   गट शिक्षणाधिकारी किशोर पाटील(साक्री), एम. आर. पवार (शिंदखेडा), एस. एन. देवरे (धुळे) एम. आर. कुवर (शिरपूर),  महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे (शिंदखेडा), व्ही. आर. पवार (साक्री) आदी उपस्थित होते. 
         पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, कमीत कमी 20 दिवस पुरेल एवढा धान्यसाठा, पोषण आहार शाळेत उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी.  शाळेत विद्यार्थ्यांची शारीरिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे.  पाण्याची व्यवस्था ज्या शाळेत नसेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
        शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देतांना तो अत्यंत स्वच्छ स्वरूपात दिला जावा जेणे करून विषबाधासारख्या घटना घडणार नाही.  त्यासाठी धान्य, तेल स्वच्छ जागेत ठेवावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
000000