शनिवार, ७ जानेवारी, २०१२

विशेष अपील निर्गत कार्यक्रमांतर्गत 600 पैकी 457 अपिले निकाली --विजय कुवळेकर


मुंबई. दि. 6: राज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडील अपिलांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दीर्घ काळ प्रलंबित असलेली अपिले निकाली काढण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्य माहिती आयोगाने विशेष अपील  निर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि. 3 जानेवारी ते 6 जानेवारी 2012 या कालावधीत 607 अपीले विचारात घेण्यात आली. त्यामध्ये 457 अपिले निकाली निघाली असल्याचे म्हणजेच जवळपास 75 टक्के अपिले निकाली निघाली असल्याचे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी सांगितले.
            राज्यात मुख्य माहिती आयोगाकडे जवळपास 19 हजार अपिले प्रलंबित असल्याचे सांगून       श्री. कुवळेकर म्हणाले की नियमित पद्धतीने या अपिलांवर कार्यवाही करण्यासाठी अंदाजे दोन ते तीन वर्षे लागतील. शिवाय ही अपिले निकाली काढेपर्यंत आणखी काही हजार अपिले दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर प्रलंबित अपिलांचा लवकरात लवकर निपटारा करून लोकांची न्याय मिळविण्याची प्रक्रिया ज्या माहितीवर आधारित आहे ती माहिती त्यांना वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. ही बाब लक्षात घेऊन या विशेष अपिल निर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून  अपिलकर्ता, जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांच्यात सुसंवाद घडवून आणल्याने, त्यांना एकत्र आणून चर्चेच्या माध्यमातून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केल्याने बरेच प्रश्न सुटण्यास मदत  झाल्याचे दिसून आले. तसेच अपिलकर्ता आणि जनमाहिती अधिकारी या दोघांच्या मानसिकतेत बदल घडून आल्याचेही त्यांनी सांगितले.
            मुंबईत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. परंतू यापूर्वी पुण्यामध्ये माहिती आयोगाने अशा कार्यक्रमातून अपिले निकाली काढल्याने प्रलंबित अपिलांचे प्रमाण खुप कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, या तीन दिवसाच्या कार्यक्रमात जी 607 अपिले विचारार्थ ठेवण्यात आली होती ती नियमित पद्धतीने विचारार्थ घेतली असती तर किमान तीन ते चार महिने लागले असते. ती चर्चेतून आणि सुसंवादातून फक्त तीन दिवसात निकाली निघाली हे या कार्यक्रमाचे यश आहे. गेल्यावर्षी दिल्ली येथे सर्व राज्यांच्या मुख्य माहिती आयुक्तांची परिषद बोलविण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील या विशेष अपिल निर्गत कार्यक्रमाची माहिती देण्यात आल्यानंतर अनेक राज्यांनी उत्सुकतेने या कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली व आपल्या राज्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. पुण्यात झालेल्या अशा कार्यक्रमात हरियाणाचे मुख्य माहिती आयुक्त तर आत्ता मुंबईत झालेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्य माहिती आयुक्त डी. राजगोपालन यांनी स्वत: उपस्थित राहून कार्यक्रमाची पाहणी केली तसेच अशा प्रकारचा कार्यक्रम गुजरात मध्ये घेण्याचा मानस व्यक्त केला असल्याची माहितीही श्री. कुवळेकर यांनी यावेळी दिली.
000

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा वारसा आजच्या पिढीतील पत्रकारांनी सुरू ठेवावा - महासंचालक प्रमोद नलावडे


मुंबई, दि. 6 : आजच्या आधुनिक काळातील पत्रकारांनी  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या पत्रकारितेचा वारसा पुढे चालवावा, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
            मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महासंचालक श्री. नलावडे बोलत होते. मंत्रालयात मिनी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास वार्ताहर संघाचे अध्यक्ष अनिकेत जोशी, कार्यवाह सुरेंद्र गांगण, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रल्हाद जाधव, श्रद्धा बेलसरे आदी यावेळी उपस्थित होते.
            महासंचालक श्री. नलावडे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या उद्दिष्टाने मराठी पत्रकारितेची बिजे रोवली त्याच भूमिकेतून आजही वृत्तपत्रांचे काम सुरू आहे. समाजातील विविध घटनांचे प्रतिबिंब वृत्तपत्रातून उमटत असते याच जाणिवेतून बाळशास्त्री जांभेकरांनी पहिल्या मराठी वृत्तपत्राचे ठेवलेले 'दर्पण' हे नाव अत्यंत समर्पक होते आणि आजही ते लागू पडते. स्वातंत्र्यपूर्व काळात बाळशास्त्री जांभेकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या मत परिवर्तनासाठी पत्रकारिता केली. त्याकाळी वृत्तपत्र हे मतपत्राची भूमिका बजावत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस महासंचालक श्री. नलावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. जोशी यांनी श्री. नलावडे यांचे स्वागत केले. किशोर आपटे यांनी  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कारकिर्दीविषयी माहिती दिली. यावेळी महासंचालक          श्री. नलावडे यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमास पत्रकार व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
0 0 0 0

दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज रोखे 10 जानेवारी रोजी विक्रीस


मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्ष मुदतीचे दोन हजार कोटी रुपयांचे रोखे एका अधिसूचनेद्वारे विक्रीला काढले असून हे रोखे भारतीय रिझर्व बँकेमध्ये मंगळवार, दिनांक 10 जानेवारी, 2012 रोजी विक्रीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध होतील. रिझर्व बँकेच्या फोर्ट, मुंबई कार्यालयात या रोख्यांचा लिलाव करण्यात येणार असून या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या भांडवली खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.
            शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र, वैयक्तिक संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त       1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
            भारतीय रिझर्व बँकेच्या फोर्ट शाखेमध्ये दिनांक 10 जानेवारी, 2012 रोजी लिलाव आयोजित करण्यात येईल. गुंतवणूकदारांनी स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, निगोशिएटेड सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 12.30 वाजेपर्यंत तर अस्पर्धात्मक बिडस् 10.30 ते 11.30 यावेळेत सादर करावेत. लिलावाचा निकाल रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 11 जानेवारी, 2012 रोजी करण्यात येईल. कर्जरोख्याचा कालावधी हा 10 वर्षाचा असेल आणि तो दिनांक 10 जानेवारी, 2012 पासून सुरु होईल तर दिनांक 11 जानेवारी, 2022 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परफेड करण्यात येईल. या कर्जरोख्यास व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कुपन दरा वढा असेल आणि हे व्याज प्रतिवर्षी दिनांक 11 जुलै आणि         11 जानेवारी रोजी सहामाही पद्धतीने देण्यात येईल.
            याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्र भाग-1 मध्ये, उपविभाग,         दिनांक 6 जानेवारी, 2011 रोजी प्रसिद्ध केली आहे.
000