बुधवार, ४ एप्रिल, २०१२

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या दुसऱ्या वर्षीच्या निकषांना 6835 ग्रामपंचायती पात्र - जयंत पाटील


मुंबई दि. 3 : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या दुसऱ्या वर्षीच्या निकषांना 6,835 ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
          आज विधानसभेत यासंबंधीचे निवेदन  केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे उपस्थित होते.
          राज्यात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या अंमलबजावणीतून गावांचा पर्यावरण पोषक शाश्वत विकास करण्यात येत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, पहिल्या वर्षी 27,920 ग्रामपंचायतींपैकी 12,193 ग्रामपंचायतींनी पहिल्या वर्षीचे निकष पूर्ण केले. त्यांना लोकसंख्येच्या निकषानुसार 353.76 कोटी रुपयांचे विशेष अनुदान वितरित करण्यात आले. यापैकी  6,835 ग्रामपंचायतींनी योजनेचे  दुसऱ्या वर्षीचे निकष पूर्ण केले आहेत. त्यांना सुमारे 275 कोटी रुपयांचा विकास निधी विविध विकास कामांसाठी दिला जाणार आहे.
          दुसऱ्या वर्षीच्या निकषांमध्ये पहिल्यावर्षी लावलेल्या झाडांपैकी किमान 25 टक्के झाडे जगली पाहिजेत, लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्यावर्षी किमान 75 टक्के झाडे लावली पाहिजेत, 75 टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबाकडे शौचालये असली पाहिजेत ती वापरात पाहिजेत, ग्रामपंचायतींची करवसुली 80 टक्के इतकी  झाली पाहिजे, संत गाडगेबाबा तसेच यशवंत पंचायतराज अभियानात प्रत्येकी 50 टक्के गुण मिळाले पाहिजेत, सार्वजनिक ठिकाणी सीएलएफ आणि एलईडी बल्ब चा किमान 50 टक्के वापर असला पाहिजे, गावातील 100 टक्के कचरा संकलन आणि त्यातील 50 टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे, 50 टक्के सांडपाण्याचे नियोजन झाले पाहिजे आणि गावात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिक वापराला बंदी असली पाहिजे यासारख्या निकषांचा समावेश होता.
          या यशस्वी गावांपैकी 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांचा  पर्यावरण विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याकरिता स्वतंत्र योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची योजनाही सुरु करण्यात आल्याचे तसेच दुसऱ्या वर्षी योजनेतील पहिल्या वर्षीचे निकष पूर्ण करण्याऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 2226 इतकी असल्याचेही  श्री. पाटील यांनी यावेळी ांगितले.

000

गणपतराव देशमुखांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक - शिवाजीराव देशमुख


मुंबई, दि. 3 : विधानमंडळाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासारखा ध्येयवादी नेता आज सतत 50 वर्षे कष्टकरी व श्रमजीवी लोकांचे नेतृत्व करीत आहे. तरुण पिढीसाठी गणपतराव देशमुख हे व्यक्तिमत्व दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे, असे गौरवद्‌गार विधानपरिषदेचे सभापती  शिवाजीराव देशमुख यांनी आज येथे काढले.
विधिमंडळातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या विधानमंडळातील कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने विधिमंडळ पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सभापती श्री.देशमुख बोलत होते.
गणपतराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने विधिमंडळात नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे उपस्थित केले, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्याने सतत 50 वर्षे गणपतराव देशमुखांना विधानसभेत प्रतिनिधीत्व दिले. यातच त्यांचे स्थान किती उजवे आहे हे दिसून येते, असे उद्‌गार ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी काढले.
कष्टकरी, श्रमजीवी जनतेवर अन्याय होणार नाही, हे तत्व देशमुखांनी सुरुवातीपासून स्वीकारले आणि आजही ते या तत्वापासून तसूभरही ढळले नाहीत. राजकारणात विचारसरणीला फार महत्व आहे, याची सुरुवात गणपतरावांनी केली, या शब्दात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी त्यांचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देतांना सत्कारमूर्ती गणपतराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील 13 तालुके आजही दुष्काळी आहेत. तेथे भरपूर पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यातील पाणी आणण्याचा प्रयत्न मला करायचा आहे आणि मी निरंतर यासाठी प्रयत्न करणार आहे.
-----

शालेय शिक्षण विभागाने प्रलंबित प्रकरणांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा --राजेंद्र दर्डा


मुंबई, दि. 3 : शालेय शिक्षण विभाग अधिक गतीमान आणि कार्यक्षम होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणाचा आढावा घ्यावा तसेच विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या शून्यावर आणण्याचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे केले.
            शालेय शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत श्री. दर्डा बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव जे. एस. सहारीया उपस्थित होते.
            श्री.दर्डा पुढे म्हणाले की, शालेय शिक्षण विभाग हा शालेय विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संबंधित असल्यामुळे अत्यंत संवेदनशील आहे. हा विभाग लोकाभिमुख व्हावा यासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करुन ते चांगल्या प्रकारे राबविले जातील याची दक्षता घेतली पाहिजे. राज्यातील शालेय शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी देशातील इतर राज्यातील शिक्षण प्रक्रिया कशा पध्दतीने राबविल्या जातात याचा तुलनात्मक अभ्यास विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे. प्रशासनातील सत्तेचे विक्रेंद्रीकरण होऊन जे अधिकार संचालक, उपसंचालक, शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले आहेत त्यांचा पूर्णपणे वापर झाल्यास लोकांच्या तक्रारीचे निवारण क्षेत्रिय स्तरावर होईल. मनुष्यबळाची पुरेशी उपलब्धता नसतानाही हा विभाग चांगले काम करीत आहे. विभाग अधिक सक्षम करण्यास या कार्यशाळेचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास श्री. दर्डा यांनी यावेळी व्यक्त केला.
            विभागातील विविध योजनांचा कालबध्द आर्थिक भौतिक आढावा घेऊन केंद्र सरकारकडील प्रकरणांचा व्यक्तीश: पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करतानाच प्रशिक्षण संगणकाद्वारे  कामकाज गतिमान करण्याची गरज अप्पर मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी यावेळी व्यक्त केली.
            माहिती अधिकाराचा कायदा विचारात घेता, कर्मचाऱ्यांना मुद्देसूद टिप्पणी लेखनाचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव शेखर गायकवाड यांनी सांगितले.
            या कार्यशाळेत शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
000