शनिवार, २५ जुलै, २०१५

जवाहर नवोदय विद्यालयाच्या नूतन इमारतीची जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून पाहणी




धुळे, दि. 25 :- गेल्या शुक्रवारी गोंदूर-नकाणे रोड वरील  30 एकर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीत यापूर्वी मेहेरगाव येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे   स्थलांतर करण्यात आलेले आहे.  नूतन इमारतीत उपलब्ध सोयी-सुविधा आणि त्रुटींची पूर्तता कशी करता येईल हे जाणून घेण्याकरिता जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज प्रत्यक्ष जाऊन नूतन इमारतीची व परिसराची पाहणी केली.  त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, शासकीय तंत्र निकेतन स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के. आर. पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता व्ही. के. सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. एस. सानप, सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाचे शाखा अभियंता एन. डी. इंगळे, महानगरपालिका शाखा अभियंता बी. डी. जगदाळे, पी. डी. चौधरी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता ए. बी. मोरे, शाखा अभियंता एन. डी. चौधरी,  जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. बोरसे आणि शाखा अभियंता पंकज शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी 30 एकर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात प्रामुख्याने ग्रंथालय, वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, भोजन कक्ष, स्वयंपाक गृह, अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थाने त्याचबरोबर पाणी पुरवठा करता बांधण्यात आलेले जलकुंभ, परिसरातील पथदिवे आदी बाबींची बारकाईने पाहणी केली.  या  पाहणी दरम्यान त्यांना आढळून आलेल्या त्रुटींबाबत विद्यालयाच्या विभागीय कार्यालय पुणे येथील अभियंता पंकज शर्मा यांना  नोंदी घेऊन त्याबाबतचा अहवाल जिल्हा समितीपुढे सादर करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची निवासव्यवस्था आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा योग्य पध्दतीने पुरविण्याबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्राचार्य आणि शिक्षक वृंदांना दिल्या.
प्रारंभी प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी मान्यवरांचे स्वागत करून जवाहर नवोदय विद्यालयाच्या नव्या परिसरात असलेल्या त्रुटींची माहिती सादर केली. 
000000


शेतकऱ्यांना उर्वरित पीक कर्जाचे वाटप बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

         धुळे, दि. 25 :- जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात  पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे चांगले काम केले  आहे असा उल्लेख करून  जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे वाटप दि. 30 जून अखेर उद्दिष्टाच्या 54 टक्के  झाले आहे.  शेतकऱ्यांना उर्वरित पीक कर्जाचे वाटप  बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सन 2015-16 या कालावधीतील पीक कर्ज वाटपाबाबत बँका आणि कृषि विभागाची  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उप विभागीय कृषि अधिकारी पी. एम. सोनवणे,  जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे,  नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे,  बँक ऑफ  महाराष्ट्रचे विनय जावळे,  अलाहाबाद बँकेचे बी. प्रसाद, सिंडीकेट बँकेचे सी. एन. पावरा,   महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी आर. बी. वीरकर,  कॅनरा बँकेचे गुप्ता, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अशोक देसले, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दत्तात्रय धनराळे, युको बँकेचे सहाय्यक प्रबंधक गोपाल प्रसाद, राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, सन 2014 मध्ये पीक कर्जाच्या नुकसान भरपाईची रक्कम पीक विमा कंपनीकडून  बँकांना वर्ग करण्यात आलेली आहे. परंतु बँकांकडे अद्याप रक्कम वर्ग झालेली नाही अशी माहिती बैठकीत देण्यात आली असून याबाबत संबंधित बँकांनी  शहानिशा करावी, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शासनाच्या पीक विमा योजनेबाबत सर्व बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्ती-जास्त शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  जेणेकरून नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल. त्यासाठी  पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000