शनिवार, २५ जुलै, २०१५

शेतकऱ्यांना उर्वरित पीक कर्जाचे वाटप बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

         धुळे, दि. 25 :- जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात  पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे चांगले काम केले  आहे असा उल्लेख करून  जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे वाटप दि. 30 जून अखेर उद्दिष्टाच्या 54 टक्के  झाले आहे.  शेतकऱ्यांना उर्वरित पीक कर्जाचे वाटप  बँकांनी लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सन 2015-16 या कालावधीतील पीक कर्ज वाटपाबाबत बँका आणि कृषि विभागाची  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उप विभागीय कृषि अधिकारी पी. एम. सोनवणे,  जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे,  नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे,  बँक ऑफ  महाराष्ट्रचे विनय जावळे,  अलाहाबाद बँकेचे बी. प्रसाद, सिंडीकेट बँकेचे सी. एन. पावरा,   महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी आर. बी. वीरकर,  कॅनरा बँकेचे गुप्ता, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अशोक देसले, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दत्तात्रय धनराळे, युको बँकेचे सहाय्यक प्रबंधक गोपाल प्रसाद, राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, सन 2014 मध्ये पीक कर्जाच्या नुकसान भरपाईची रक्कम पीक विमा कंपनीकडून  बँकांना वर्ग करण्यात आलेली आहे. परंतु बँकांकडे अद्याप रक्कम वर्ग झालेली नाही अशी माहिती बैठकीत देण्यात आली असून याबाबत संबंधित बँकांनी  शहानिशा करावी, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शासनाच्या पीक विमा योजनेबाबत सर्व बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्ती-जास्त शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  जेणेकरून नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल. त्यासाठी  पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा