गुरुवार, ११ जून, २०१५

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना

मुंबई, दि.8 : परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली असून या बाबतची  अधिसूचना रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
          या परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम), राज्यमंत्री (परिवहन), राज्यमंत्री (गृह), अपर मुख्य सचिव (गृह), अपर मुख्य सचिव (परिवहन),सचिव, सार्वजनिक बांधकाम (राज्य व राष्ट्रीय महामार्ग), आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई, संचालक, मार्ग परिवहन मध्यवर्ती परिवहन संस्था, पुणे हे सदस्य असून परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे सदस्य सचिव आहेत.
या परिषदेच्या बैठकींसाठी विशेष निमंत्रित अधिकारी म्हणून अपर मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य), प्रधान सचिव (नगर विकास-2), प्रधान सचिव (शालेय शिक्षण), महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण; महासंचालक, माहिती व जनसंपर्क ;तसेच अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन, मुंबई; संचालक, मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी,; अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रक टेम्पो ओनर्स असोसिएशन हे असणार आहेत.
 प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अथवा पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ते सुरक्षा समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून या समितीमध्ये  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपरिषदेचा मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा नगरपालिका उपआयुक्त हे सदस्य असतील तर प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

००००

दहावी व बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा -विनोद तावडे

मुंबई, दि.8: दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जवाहर बालभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करुन श्री. तावडे  म्हणाले की, जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी निराश न होता अंगभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करुन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल असे श्री. तावडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फेरपरीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल. यावर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत  अशा प्रकारची फेरपरीक्षा घेता येईल का, याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल चांगला लागला असून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात एकूण 14 लाख 37 हजार 922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यभरात 11 वीच्या प्रवेशासाठी 15 लाख 68 हजार 664 जागा उपलब्ध आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ 8 टक्के विद्यार्थी नापास झाले असून या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांनी करिअर विषयकउपक्रम राबवावेत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
000