गुरुवार, ११ जून, २०१५

दहावी व बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा -विनोद तावडे

मुंबई, दि.8: दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जवाहर बालभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करुन श्री. तावडे  म्हणाले की, जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी निराश न होता अंगभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करुन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल असे श्री. तावडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फेरपरीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल. यावर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत  अशा प्रकारची फेरपरीक्षा घेता येईल का, याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल चांगला लागला असून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात एकूण 14 लाख 37 हजार 922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यभरात 11 वीच्या प्रवेशासाठी 15 लाख 68 हजार 664 जागा उपलब्ध आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ 8 टक्के विद्यार्थी नापास झाले असून या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांनी करिअर विषयकउपक्रम राबवावेत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा