शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

बोगस वैद्यकीय व्यवसायीकांवर कारवाई करणार :- जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे दि.28 :- बोगस वैद्यकीय व्यवसायिकांबद्दल नागरिकांची तक्रार आल्यास तसेच जे पात्रता नसतांनाही वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर भरारी पथक नेमुन अचानकपणे कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
          आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्या संदर्भात जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बैठकीस उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एस.पी.भामरे, पोलीस उप अधीक्षक (मुख्या) आय.टी.वसावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.व्ही.पाटील,महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप पाटील, आर.आर.बाविस्कर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन र.पा.थेटे, सदस्य ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे ॲड.चंद्रकात येशीराव, नाशिक विभाग उपाध्यक्ष ग्राहक पंचायतचे डॉ.योगेश हिम्मतराव सुर्यवंशी, डॉ.व्ही.एस.वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की वैद्यकीय व्यवसायिकाने ज्या पॅथीचे शिक्षण घेतले आहे.त्याच पॅथीच्या पध्दतीने उपचार करावा,तसेच बोगस आयुर्वेद व औषधा संदर्भात वृत्तपत्रातुन प्रसिध्दी होणा-या फसव्या जाहिराती बंद करण्याच्याही सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या आहेत.त्याचप्रमाणे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणा-यावर भरारी पथकाची नेमणूक करुन  अचानक धाडी घालण्याच्या सुचनाही यावेळी जिल्हाधिका-यानी दिल्यात.                                 00000

उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी राज्याने देशाचे नेतृत्व करावे -सी. विद्यासागर राव

मुंबई, दि. 28 : उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जागतिक श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी राज्यातील विद्यापीठांनी दर्जेदार शिक्षण व संशोधनाच्या सहाय्याने देशाचे नेतृत्व करावे, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.
            'उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण: नवी दिशा' या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ येथे परीषेदेचे आयोजन करण्यात आले होत त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर, उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जे.बी. जोशी, तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षण तंज्ज्ञ आदी उपस्थित होते.
            राज्यपाल पुढे म्हणाले की, भारतातील तक्षशिला व नालंदा ही विद्यापीठे फार पुर्वीपासून जागतिक शिक्षणाची केंद्रेहोती. त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांनी दर्जेदार शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांच्या आशा आणि आकांक्षा पुर्ण करण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठात शिक्षण घेतल्यामुळे रोजगाराची खात्री मिळेल या आशेने अनेक गरीब पालक आपल्या मुलांना पैसा खर्च करुन  उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवितात. आजची विद्यापीठे अशा रोजगाराची खात्री देऊ शकतात का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. पराकाष्टा, विस्तार, नि:पक्षपातीपणा ही उच्च शिक्षणातील महत्वाची ध्येय आहेत. ही उदिष्टे पुर्ण करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. राज्यातील कमीत कमी दोन विद्यापीठे जगातील सर्वोत्कृष्ठ शंभर विद्यापीठाच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे देश पातळीवर आणि राज्य पातळीवर देखील विद्यापीठ व महाविद्यालयांनी पुढील काळात आपली गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या विद्यापीठाने पुढाकार घेऊन परदेशी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. पायाभुत सुविधा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुवीधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढील पाच वर्षामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहाय्याने 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त फंड ऊभा करावा.विद्यापीठाने उद्योजक तसेच नौकरी निर्माण करणारे  विद्यार्थी पुढील काळात घडवावेत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
            उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, पुढील दहा वर्षासाठीचा शैक्षणिक विकास आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण आहे. राज्यातील विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करताना विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानयुक्त दर्जेदार  शिक्षण मिळेल याची काळजी घ्यावी. मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यात मोठी गुंतवणूक होत आहे. यासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा.  जगातील सर्वोत्तम शिक्षण पध्दती राज्यात येण्याची गरज असल्याचेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
            उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर म्हणाले की, पुणे, मुंबई विद्यापीठाप्रमाणे राज्यातील इतर विद्यापीठामध्ये देखील परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी आले पाहिजेत यासाठी इतर विद्यापीठाने प्रयत्न करावेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रुघुनाथ माशेलकर म्हणाले की,  विद्यापीठांनी प्रथम स्वत:ला  सक्षम बनवून नंतरच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी  करार करावा. भारतामध्ये संशोधनाला प्राधान्य देणारी विद्यापीठे तयार झाली पाहीजेत.   त्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता, गुणवत्तापुर्ण शिक्षण व उपयुक्त संशोधन यावर भर देणे गरजेचे आहे. भारतातील उच्च शिक्षणाबाबतच्या विविध आव्हानांबाबत यावेळी श्री. माशेलकर यांनी सविस्तर चर्चा केली.

0 0 0  0