शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

त्र्यंबकेश्वर येथे भक्तीमय उत्साहात शाहीस्नान


श्रीक्षेत्र  त्र्यंबकेश्वर, दि.29: सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीतील शाहीस्नान आज पहाटे येथे भक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडले. या पर्वणीत देशभरातून आलेल्या विविध मानाच्या आखाड्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत व असंख्य भाविकांनी स्नान केले. उत्साहाने भारलेल्या या सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले सुक्ष्म नियोजन आणि जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संजय मोहीते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने ठेवलेला चोख बंदोबस्त यामुळे शाही स्नान शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले.
पहाटे 4 वाजेच्या सुमारास शाही स्नानास प्रारंभ झाला. हर हर महादेवचा जयघोष करत आणि विविध वाद्यांच्या गजरात विविध आखाडे मिरवणुकीने कुशावर्तात दाखल होत होते. आपापल्या मानानुसार विविध आखाड्यांनी त्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत यांच्यासह उपस्थिती लावून कुशावर्तातील कुंडात शाहीस्नान केले. प्रशासनाने यासाठी पाणी, प्रकाश व्यवस्था, आखाड्यांचे आगमनाचे आणि परतीचे मार्ग, जीवरक्षक दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, प्रसार माध्यमांची व्यवस्था अशी सर्व बाजूंनी चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे साधुंना निर्विघ्नपणे शाहीस्नानाचा विधी पूर्ण करता आला. 
श्री. शंभू पंचदशनाम जुना आखाडा (निलपर्वत) यांची मिरवणूक गुरुगद्दी रमता पंच छावणी येथून निघाली. त्यापाठोपाठ श्री. पंचदशनाम आवाहन आखाड्याचे आणि त्यानंतर पंच अग्नी आखाड्याच्या साधु, महंतांची मिरवणूक निघाली. आजच्या सिंहस्थ पर्वातील ही पहिली शाही मिरवणूक होती. पिंपळंद शिवारातून या मिरवणूकांना प्रारंभ झाला. दुसऱ्या शाही मिरवणूकीत श्री. तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री. तपोनिधी पंचायती आनंद आखाडा या दोन आखाड्याच्या साधु महंतांनी  सहभाग घेतला. तिसऱ्या शाही मिरवणूकीत श्री. पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री. शंभू पंचायती अटल आखाडा या आखाड्याच्या साधु महंतांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम श्री. पंचादश जुना आखाडा, आवाहन आखाडा, श्री. पंचायती अग्नी आखाडा, श्री. पंचायती निरंजनी आखाडा, श्री. पंचायती आनंद आखाडा, श्री. पंचायती महानिर्वाण आखाडा, श्री. पंचायती अटल आखाडा यांनी या वेळी शाहीस्नानाची पर्वणी साधली. त्यानंतर श्री. पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री. पंचायती नवा उदासीन आखाडा आणि  श्री. निर्मल पंचायती आखाड्याच्या साधुंनी मिरवणूक काढली. श्री. पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री. पंचायती नवा उदासीन आखाडा, श्री. पंचायती निर्मल आखाडा यांनी शाहीस्नान केले. दुपारी 12 वाजल्यानंतर  सर्वसामान्य भाविकांना शाहीस्नानासाठी सोडण्यात आले.या मिरवणूकी दरम्यान सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता. भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने केलेल्या चोख आणि परिपूर्ण तयारीने कोणताही अनुचित प्रकार न घडता यंदाच्या सिंहस्थातील पहिले शाहीस्नान शांततेत व भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडले.

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई दि 28:  ग्रंथपाल संचालनालयामार्फत दरवर्षी जून महिन्यात घेण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेच निकाल जाहीर करण्यात आला आहे. जून 2015 मध्ये राज्यातील 27 जिल्हास्तरीय केंद्रामधून एकूण 1 हजार 539 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी 1 हजार 21 विद्यार्थी उत्तीर्ण व 518 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 66.34 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक निकाल रत्नागिरी केंद्राचा 92.86 आणि सर्वांत कमी निकाल परभणी केंद्राचा 7.89 टक्के लागला आहे.
विभागांमध्ये नागपूर विभागाचा निकाल 80.46%, पुणे विभागाचा निकाल 54.78 टक्के लागला आहे. परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रावर 5 सप्टेंबर 2015 नंतर मिळणार आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनयिम, 1967 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्याचे काम ग्रंथालय संचालनालयाचे असते. त्यानुसार दरवर्षी संचालनालयाकडून जून महिन्यात परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षेचे वर्ग राज्यातील राज्य/विभाग ग्रंथालय संघांकडून शिफारित केलेल्या जिल्ह्यांतून चालविण्यात येतात.
ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुलक आणि अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे 15 सप्टेंबर 2015 पर्यंत करावेत, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.

000

तंटामुक्त गाव मोहीम बातमीदारांना पुरस्कार देण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती गठीत

 मुंबई,दि. 28 : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे  वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या बातमीदारांना गुणवत्तेनुसार (सन 2013-14) मधील पुरस्कार देण्यासाठी गृह  राज्यमंत्री (ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
या मोहिमेची प्रभावी व यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यामध्ये पूरक व  प्रबोधनात्मक बातम्यांद्वारे प्रसिध्दी देण्याऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना हा पुरस्कार देण्यात येणार असून जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन (3) पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या राज्यस्तरीय निवड समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. अपर मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालकमराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी किरण नाईक, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे, दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी संजय बापटदैनिक हिंदुस्थानचे प्रतिनिधी सर्फराज आरजू, तसेच  टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी संजीव शिवडेकरतर उपसचिवगृह विभाग (कार्यासन,पोल-15) हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
००००