मंगळवार, २३ जून, २०१५

विमानतळ परिसरातील विनावापर जमीनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.22: मिहान प्रकल्प विमानतळानजीकची जमीन उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना वितरीत करण्यात आली होती. तथापि, उद्योजकांनी त्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे अशा जमीनी परत घेण्याबाबत धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.
            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची50 वी बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस.मीना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक अशिषकुमार सिंह, नागपूर सुधार न्यासचे अध्यक्ष श्याम वर्धने आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या क्षेत्रात आयटी टाऊनशिप करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करावे. स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होईल याचेही नियोजन करावे. विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी कार्यवाही सुरु केली आहे. त्यांना सवलत देण्याबाबत विचार करावा. शिर्डी येथील विमानतळ परीसर विकास करण्यासाठी नियोजन प्राधिकारी म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस नियोजन प्राधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच मिहानसाठी विकास नियंत्रण नियमावली व आराखडा नव्याने तयार करण्यास या बैठकीस मान्यता देण्यात आली.
            विमानतळ परिसरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छतेची सप्तपदी कार्यक्रम राबवावी. अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद येथील विमानतळ विकासित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा