मंगळवार, ९ जून, २०१५

केंद्र सरकारकडून सागरी मार्ग प्रकल्पास मंजुरी

 नवी दिल्ली, 8 जून : केंद्र सरकारने आज मुंबई सागरी मार्गास मंजुरी दिली. यासंदर्भात १५ जून २०१५ पर्यंत मसुदा अध्यादेश व १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत अंतिम अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
      इंदिरा पर्यावरण भवन या पर्यावरण व वने मंत्रालयाच्या इमारतीत मुंबई सागरी मार्गा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त यु.एस.मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
      बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आजच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.  या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूकीचा ताण मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सद्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक ही पश्चीम एक्सप्रेसहून होते.सागरी मार्गामुळे पश्चीम एक्सप्रेसवरील वाहतूकीचा ताण कमी होईल. या रस्त्यांमुळे पर्यावरणची हानी होणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल तसेच यामार्गावर इमारत बांधकामांना परवानगी न देण्याबाबतची काळजी ही राज्य शासन घेईल.या सागरी मार्गावरील ९१ हेक्‍टर जागेत हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. केवळ वाहतूकीचा ताण कमी करणे आणि हरित क्षेत्र तयार करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग करू असे मुख्यमंत्री म्हणाले. सागरी मार्ग ही केंद्र सरकारने मुंबईकरांना दिलेली भेटच मी समजतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  पर्यावरण रक्षणासाठी मुंबई सागरी मार्ग महत्वाचा : जावडेकर
देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबई सागरी मार्ग महत्वाचा असून नियम कायदे व पर्यावरणाची काळजी घेऊन येत्या आठवडाभरात मुंबई सागरी मार्गाबाबत प्रस्तावित अध्यादेश आणणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यानंर काही सूचना आल्यात तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण आणि प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल असेही जावडेकर म्हणाले.  
    सागरी मार्गाबाबत महत्वाचे

·        सागरी मार्गाचे अंतर ३४ किलो मिटर
·        नरिमन पाँइट ते कांदिवली भागातून जाणार सागरी मार्ग
·        हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित.
·        येत्या पाच ते सहा वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्धारीत
·        या प्रकल्पाद्वारे ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव
·        गर्दीच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्याकरिता सागरी मार्गात २ ठिकाणी आंतरसुमुद्री बोगदा तयार करण्यात येतील
·        या प्रकल्पातंर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार
·        पश्चिम एक्सप्रेसवरील वाहतूकीचा ताण कमी होणार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा