बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

दहावीतील नापास विद्यार्थ्यांवरील शिक्का पुसण्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम - विनोद तावडे

मुंबई दि 9 : दहावी फेरपरीक्षा लगेचच घेण्याच्या निर्णयामुळे यावर्षी राज्यातील 55 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यात राज्य शासनाला यश आले. यापुढे दहावीच्या परीक्षेत कोणीही विद्यार्थी नापास होणार नाही याची काळजी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणार आहे. दहावी परीक्षेत नापास झालेल्या विदयार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन करुन त्यांना कौशल्यवर आधारित अभ्यासक्रम शिकवण्यावर भर देण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत महानगरपालिका शाळांमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना टॅब वितरण समारंभाचे आयोजन आज विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटयगृहात आयोजित करण्यात आले होते. श्री. तावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना टॅब वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर अलका केरकर, आमदार  सुनील प्रभू, आमदार संजय पोतनीस, आमदार ॲड अनिल परब, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, शिक्षण उपायुक्त रणजित ढाकणे उपस्थित होते.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की, काळाप्रमाणे शिक्षण आणि शिक्षणाची पध्दत बदलणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा मार्ग अवंलबून मुलांना शिक्षण देणे आवश्यक आहे. आज आठवीच्या विदयार्थ्यांना देण्यात आलेले टॅब म्हणजेच या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असे म्हणता येईल. आजच्या परीक्षा प्रणालीमध्ये काही बदल करीत असताना विद्यार्थ्यांना चौकटीबाहेरचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी नव्या तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.
            प्रसिध्द गीतकार गुलजार यांचे उदाहरण देतश्री. तावडे म्हणाले की, गुलजार साहेबांनी काही वर्षांपूर्वी मैं तुलसी तेरे आँगन कीहे गाणे लिहिले तर अनेक वर्षांनंतर बदलते प्रवाह लक्षात घेऊन गुलजार यांनीच चप्पा चप्पा चरखा चले अशी गाणीही लिहिली. गुलजार यांनी बदलते प्रवाह स्वीकारले आणि ते यस्वी झाले. याचाच अर्थ आजच्या शिक्षकांनीही काळाप्रमाणे आपले विचार मांडण्याची, करण्याची पध्दत बदलणे आवश्यक आहे. आज मुलांचा बुध्दयांक वाढविण्यासाठी तंत्रज्ञान आणि दृश्य माध्यमांचा उपयोग करुन घेणे आवश्यक आहे.




अवयव दानासाठी जनजागृती करा

शालेय शिक्षणाबरोबरच मी वैद्यकीय शिक्षण मंत्रीही आहे. या नात्याने मला वाटते की, महाराष्ट्रात अवयव दानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणही यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन श्री. तावडे यांनी यावेळी केले.

टॅब म्हणजे आजची ई- पाटी ध्दव ठाकरे

या कार्यक्रमात बोलताना श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शाळेत गमभनचे धडे गिरवायला लागलो तेव्हा माझी आई माझा हात धरुन मला पाटीवर गमभन शिकवायची. आता 2015 मध्ये मुलांच्या हाती टॅब देण्यात आला आहे. मला असे वाटते की, हा टॅब म्हणजे ई-पाटी आहे. या ई-पाटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सोपे होईल, असा मला विश्वास वाटतो. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विदयार्थ्यांना आपण टॅब दिले आहेत. आगामी काळात हेच महानगरपालिका शाळेत शिकलेले विद्यार्थी टॅब तयार करतील, असा मला विश्वास वाटतो.

या टॅबची ठळक वैशिष्टये सांगताना महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, या टॅबमुळे आठवीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अधिक रुची निर्माण होण्याबरोबरच विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानादवारे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय विदयार्थी स्वयंअध्ययनास प्रवृत्त होणार आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टॅबचा वापर शालेय विदयार्थ्यांना करता येतो आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. देशात पहिले व्हर्च्युअल क्लासरुम सुरू करणाच्या मान बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आहे. आता शालेय विद्यार्थ्यांना टॅब देण्यातही देशातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान आम्हाला मिळाला आहे ही अभिमानाची बाब आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी या टॅबच्या वैशिष्टयांविषयी माहिती दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा