सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण विद्यार्थी परिषदेतून होते-मुख्यमंत्री

नागपूर, दि.२२-राष्ट्रीय भावनेशी प्रेरीत होऊन विद्यार्थी परिषदेत येतात. ख-याअर्थाने राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण या ठिकाणी होते,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 विद्यार्थी परिषदेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही कालावधीनंतर नेतृत्वगुण निर्माण होतो.जेव्हा जेव्हा देशावर संकट येतो,त्यावेळी युवाशक्ती सर्वात पुढे असते. राष्ट्रीय भावनेचे बिजारोपन करणाऱ्या या नूतन इमारतीचा उपयोग चांगल्याप्रकारे करावा. या इमारतीच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवावे,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पीठाधीश श्री. देवनाथ मठ,अंजनगाव,आचार्य जितेंद्रनाथ महाराज, खासदार अजय संचेती, प्रमिलाताई मेंढे, शांताआक्का ,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, राष्ट्रीय संघटक मंत्रीसुनिल अंबेकर, राष्ट्रीय महामंत्री   श्रीहरी बोरीकर,  प्रांत अध्यक्ष, डॉ. केदार, ठोसर,  सचिन रणदिवे  यांची प्रमुख उप स्थिती होती.
सशक्त राष्ट्रनिर्माण करणे आणि ध्येयाने प्रेरित असलेले युवक निर्माण करणे गरजेचे आहे हे महत्वाचे कार्य विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केले जाते. राष्ट्र निर्माण आणि विकासासाठी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रकार्य, संघटन, ज्ञान आणि ज्ञानासोबत चारित्र्य एकत्रित असणे महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून नवीन पिढी एकत्रित येण्याची महत्वपूर्ण प्रक्रिया घडत असून देशात युवकांची लक्षणीय संख्या आहे.या युवकांमध्येच प्रचंड ऊर्जा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या युवाशक्तीच्या ज्ञानाला योग्य दिशा मिळाल्यावर जगात देशाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. वैयक्तिक ध्येयाचा पाठपुरावा करत असतांना समाजाच्या हितासाठीही युवकांनी वेळ देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रशिक्षण रुजविण्याची गरज व्यक्त करुन ते म्हणाले राष्ट्रकार्याच्या यज्ञाचे प्रतिक म्हणून हे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी   सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्या हस्ते छात्रसेना मासिकाचे विमोचन करण्यात आले.
तत्पूर्वी  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच खासदार अजय संचेती यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी राष्ट्रीय संघटक मंत्रीसुनिल अंबेकर, , राष्ट्रीय महामंत्री   श्रीहरी बोरीकर,  प्रांत अध्यक्ष, डॉ. केदार, ठोसर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रफुल्ल आकांत यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी नक्षिणे यांनी केले.
                                                            *****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा