शुक्रवार, २ मार्च, २०१२

100 कोटी झाडं लागवडीचा नियोजनबध्द कार्यक्रम राबविणार - डॉ. पतंगराव कदम


मुंबई, दि. 1 : राज्यात 100 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून या उद्दिष्टपूर्तीसाठी येत्या वर्षात नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करावी तसेच लावलेली रोपे जगविण्याच्या दृष्टीने संबंधितांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे दिले.
             आज मंत्रालयात आयोजित वन विभागाच्या साप्ताहिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
            राज्यात यावर्षी 100 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून झाडे लावण्यासाठी 97 टक्के रोपांची तयारी झाली आहे तर 25 टक्के खड्डे रोप लागवडीसाठी तयार आहेत. रोप लागवडीसाठी 1 जून 2012 पूर्वी  नियोजनबध्द आराखडा तयार करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
          मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी तयार केलेल्या वनक्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनावर आधारित माहितीपट सीडीचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते यावेळी उदघाटन करण्यात आले.

वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक असून वाघ मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना टाळण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात यावी तसेच राज्यातील अभयारण्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीतून जास्तीत जास्त वनतळी बांधण्यात यावीत, अशा सूचनाही श्री. कदम यांनी यावेळी केल्या.  
            या बैठकीत राज्यातील अभयारण्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र तयार करणे, वनजमिनीचे दप्तर अद्ययावत करणे, वृक्षतोड बंदी, अभयारण्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन, वनविभागाची न्यायालयीन प्रकरणे, वनमजुरांना कायम करणे, वनविभागाच्या प्रसिध्दी विभागाचे सक्षमीकरण इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा