शुक्रवार, २ मार्च, २०१२

राज्य विकासाचे मुलभूत विचार पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी मांडले - मुख्यमंत्री


मुंबई दि. 1 :  समाजकारण, अर्थकारण, राजकारण, सहकार, शिक्षण, कृषी आणि जलसंधारण यासारख्या विविध विषयांमध्ये राज्याचा जो विकास झाला त्याचा मुलभूत विचार मांडण्याचे काम सहकार महर्षी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
श्रीलक्ष्मी महिला सहकारी बँक, सांगली यांनी पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता देऊन भारतीय टपाल खात्याने डॉ. वसंतदादा पाटील यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकिट आज जारी केले. या टपाल तिकटाचे अनावरण आज वसंतदादांच्या 23 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री मधुकर चव्हाण, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, वसंतदादांच्या पत्नी तथा माजी मंत्री शालिनीताई पाटील, आमदार माणिकराव ठाकरे, मुख्य पोस्ट मास्तर जनरल श्रीमती उमेरा अहमद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी श्रीमती उमेरा अहमद यांच्या हस्ते या टपाल तिकिटाच्या अल्बचे प्रकाशन करण्यात आले तर उपस्थित काही मान्यवरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.
डॉ. वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व, त्यांचा आदर्श नव्या पिढीने आवर्जुन ठेवावा इतके अनन्यसाधारण स्वरूपाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विभागीय असमतोलासारखा गंभीर विषय दादांनी पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर मांडला आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी  वि. . दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीची स्थापना केली. त्याप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज आणि पाटबंधारे क्षेत्रात पाणी अडवा-पाणी जिरवा सारखे महत्त्वाचे आणि राज्याच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे विषय त्यांनी अतिशय कुशलतेने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. ऍ़ड. शालिनीताई पाटील यांनी दादांचे हे कार्य पुढे चालू ठेवल्याने त्यांच्या प्रयत्नातून आज  प्रकाशित झालेल्या दादांच्या टपाल तिकिटामुळे दादांचे कार्य देशभर समजण्यास मदत होईल, नवी पिढी त्यातून नक्कीच प्रेरणा घेईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
वसंतदादा म्हणजे प्रत्येकाला आपला वाटावा असा साधा आणि सरळ पण अतिशय दूरदृष्टीचा माणूस अशा शब्दात वसंतदादांच्या कार्याचा गौरव करून वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले की, आर्थिकदृष्टया समृद्ध असणाऱ्या या राज्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा विस्तार हे ही त्यांच्या कार्याचे एक वैशिष्ट्य आहे. लोकशाहीमध्ये नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसंतदादा असून त्यांच्या कार्यकुशलतेचा गौरव म्हणून सांगली मध्ये त्यांचे स्मारक बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
            आपल्या प्रास्ताविकात शालिनीताई पाटील यांनी दादांनी विविध क्षेत्रात केलेल्या लक्षवेधी कामगिरीचा आढावा घेतला.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा