गुरुवार, ४ जून, २०१५

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच -मुख्यमंत्री

मुंबई, दि. : शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात जुन्या कर्जाचे व्याज भरावे लागणार नसून कर्जमाफी संदर्भात  15 जून पर्यंत निर्णय घेण्यात येईल अशी,  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सर्वश्री सुनिल तटकरे, राजेश टोपे, राणा जगजित सिंह, विक्रम काळे, जयदत्त क्षीरसागर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.  
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व  पीक विमा संदर्भात सर्वात जास्त 350 कोटींचा निधी बीड जिह्याला उपलब्ध करुन दिला जाणार असून त्यामुळे  अतिरिक्त भार  सरकारवर पडणार आहे. तसेच जलयुक्त शिवार कार्यक्रमात विविध योजनांच्या माध्यमातून विविध कामे पार पाडली जाणार आहेत. शेतकऱ्यांना दूध दरवाढी संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने यावेळी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्या मांडण्यात आल्या.  मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी, फळबाग वाचविण्यासाठी हेक्टरी 35 हजार रुपये देण्यात यावे, साखरेच्या एफआरपीबाबत निर्णय घेण्यात यावा, धनगर समाज आरक्षण इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा