मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा - पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील

धुळे, दि. 11 :- दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.
            राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा.  या संदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.  तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 चे कलम 2 अनुसार कारवाई करण्यात येते.  काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तीक रित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.  जेणेकरून नंतर हे छोटे-छोटे राष्ट्रध्वज रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला किंवा इतस्तत: ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात.  हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाचे वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावे अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील तर त्यांचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदी अनुसार नष्ट करणे आवश्यक असते.
            रस्त्यात  पडलेले इतस्तत: विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लॅस्टिकचे असतील तर प्लॅस्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.  राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही  बाब  गंभीर असल्याने केंद्र शासनाच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. 
            जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोटया कागदी ध्वजाचा वापर करण्यात यावा तथापि अशा कागदी ध्वजाचा वापर करतांना त्याचा योग्य तो मान राखणे आवश्यक आहे.  तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून  देऊ नये, असे राष्ट्रध्वज खराब झालेले आहेत, असे आढळल्यास ते ध्वज संहितेतील तरतुदी अनुसार नष्ट करण्यात यावे.  राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही पत्रकात नमूद केले आहे. 

0000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा