मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

तीन वर्षात धुळे जिल्हा दुष्काळमुक्त होण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे -आमदार जयकुमार रावल

धुळे, दि. 26 :- येत्या तीन  वर्षात धुळे जिल्हा दुष्काळमुक्त  होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन समिती लघु गटाचे अध्यक्ष तथा आमदार जयकुमार रावल यांनी आज केले. 
            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 प्रारूप आराखड्याबाबत लघुगटाची बैठक आ. जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,  जिल्हा नियोजन समिती लघुगट सदस्य श्रीमती सुशिलाबाई ईशी, निकम कामराज उर्फ दिगंबर जगदीश, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जे. के. ठाकूर,  समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बी. एस. देवरे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            आमदार श्री. रावल म्हणाले, शासनाचा जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम असून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांना जादा निधी दिला जाईल.  त्यासाठी यंत्रणांनी जलसाठे निर्माण करण्यासाठी कामे प्रस्तावित करावीत.  जिल्ह्याची गरज पाहून कामे करून  लघुगटाच्या माध्यमातून चांगल्या योजना  राबविण्यासाठी  प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
            पुढे बोलतांना आ. श्री. रावल म्हणाले, धुळे जिल्हा दुग्ध उत्पादनात अग्रेसर होता.  सद्य:परिस्थितीत जिल्ह्यात दुग्ध वाढीसाठी गायी, म्हशींच्या दुधाळ जनावरांच्या वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे पशुसंवर्धन विभागाने नियोजन करावे.  तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणासाठी 2 लाख रूपयांची तरतूद करण्यात यावी.  जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व्यायाम शाळा, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 प्रारूप आराखडा अंतर्गत सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व ओटिएसपी योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला.  त्यात कृषि व संलग्न सेवा, पशुसंवर्धन, कामधेनू योजना, एकात्मिक दूध योजना, मत्स्य संवर्धन, वने व वन्यजीवन, सहकार विभाग, एकात्मिक ग्रामीण विकास विकास, ग्राम पंचायत, लघु पाटबंधारे, प्राथमिक शिक्षण, क्रीडा, कला व सांस्कृतिक विकास, वैद्यकीय शिक्षण, हिवताप, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, अग्निशम सेवा, वीज, माहिती व प्रसिध्दी, तंत्र शिक्षण, सामाजिक न्याय आदी योजनांचा तपशिलवार आढावा  संबंधित विभाग प्रमुखांनी यावेळी सादर केला.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा