शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२





भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण
राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या हस्ते संपन्न
                धुळे दि. 26 जाने. 12:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे आदिवासी विकास, कामगार, लाभक्षेत्र व फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शानदार सोहळयात संपन्न झाला. यावेळी मंत्रीमहोदयांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन परेडची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
       यावेळी ना. गावीत यांनी उपस्थित जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छापर संदेशात  सांगितले की, जिल्हयात अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांची उभारणी होत असून त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अशा दोंडाईचा औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी मेथी-विखरण या दोन्ही गावातील 435.87 हेक्टर आर जमिन संपादित करण्यासाठी 10 लाख रुपये प्रतिहेक्टरी वाढीव दराने मोबदला देण्याच्या भुधारकांच्या मागणीनुसार आणि प्रशासनाच्या शिफारशीनुसार शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जमीन खरेदीस सुरवातही झालेली आहे. दोन हजार कोटी रुपयांचा साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे सौर ऊर्जा महा प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 460 हेक्टर वन जमिनीचा प्रस्ताव भारत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर 10 हजार हेक्टर क्षेत्रावर कार्गोहब प्रकल्पाची उभारणी, 500 कोटी रुपयांचा लुपीन फौंडेशन संस्थेतंर्गत जिल्हयातील 225 गावांचा पायाभूत विकास  होत असून  सोनगीर येथे रुपये 3,400 कोटी गुंतवणूक करुन 48 हेक्टर क्षेत्रावर 567 के.व्ही. उप केंद्रासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा अनेक प्रकल्पातून सुशिक्षित बेरोजगार, सर्वसामान्य माणसाच्या हातास काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सातत्याचे प्रयत्न आहेत.                                                                                              
       जिल्हयातील साक्री व शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना वन हक्काच्या 67,023.25 एकर जमिनीचे 13,260 लाभार्थ्यांना  वाटप करण्यात आले असून त्यामुळे आदिवासीच्या जीवनांत नवी पहाट निर्माण झाली आहे. राज्य शासन कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने विचार करत असून कामगारांना त्यांच्या कामाचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हयात दोन मोठे बॅरेज व अक्कलपाडा धरणाचे काम अंतीम टप्प्यात असल्यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठया प्रमाणात सोय झाली असून धुळे शहरासह जिल्हयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. जिल्हयात शैक्षणिक संस्थांचे जाळे मोठया प्रमाणात विणले गेले  आहे.
       जिल्हयातील शेतक-यांनी शेतीला जोड धंदा म्हणून फलोत्पादनासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करावेत यासाठी शासन मोठया प्रमाणात सबसिडी देते. त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा.  त्याच बरोबर शेततळयांना मोठया प्रमाणावर प्राधान्य देऊन शेततळयांच्या माध्यमातून शेतक-यांना वेगवेगळे पिके घेण्यास मदत होईल.
       जिल्हयाच्या विकासाला ख-या अर्थाने चालना मिळते ती दळणवळणांच्या साधनांपासून. धुळे जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 च्या चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.  नागपूर ते सुरत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरी-करणाची निविदाही काढण्यात आली असून या कामास लवकरच चालना मिळणार आहे. चौपदरीकरणामुळे जिल्हयाच्या विकासात निश्चित भर पडणार आहे.श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे काम मोठया प्रमाणावर प्रगतीपथावर असून लवकरच सामान्य रुग्णांसाठी  ते खुले केले जाईल.
       ते पुढे म्हणाले की घरेलू कामगार महिलांचा प्रश्नही गंभीर असून घरेलू कामगारांची नोंदणी सुरु केलेली आहे.यावेळी ना. गावीत यांच्या हस्ते महानगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता उत्सवानिमित्त शहरातील महाविद्यालये व विद्यालयांना प्रमाण्पत्रांचे वाटप करण्यात आले त्यात  जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवपुर, धुळे, कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे, न्यु सिटी हायस्कुल, धुळे, कानोसा कॉन्व्हेट हायस्कुल, धुळे, जे. आर. सिटी हायस्कुल, धुळे आणि एकविरा हायस्कुल, धुळे या शाळांना निर्मलशाळा व निर्मल महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला. यावेळी मंत्रीमहोदयांनी वेगवेगळया शाळांनी आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
       यावेळी महापौर मंजुळा गावीत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कलाताई ठाकरे, उपाध्यक्ष सुभाष देवरे, न्यायमूर्ती बी.एन. देशपांडे, महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे,अधिक्षक अभियंता बेंद्रे, वैद्यकीय अधिष्ठात डॉ. गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड , शाम सनेर, युवराज, करनकाळ,एम.जी. ढिवरे,पदाधिकारी , स्वातंत्र्य सैनिक , ज्येष्ठ नागरीक , लोकप्रतिनिधी, पत्रकार , अधिकारी, कर्मचारी ,विद्यार्थी मोठया संख्येने  उपस्थित होते.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा