बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

ग्रामीण भागातील महिलांनी मुलांच्या पोषणाची काळजी घ्यावी - जि. प. अध्यक्षा श्रीमती सरला पाटील




            धुळे, दि. 12 :- ग्रामीण भागातील महिलांनी स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या पोषणाची व्यवस्थित काळजी घेतली तर देशाचे भविष्य घडविणारी नवीन सुदृढ पिढी तयार होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सरला पाटील यांनी केले.
            भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने आयोजित माता व बाल आरोग्य आणि मिशन इंद्रधनुष्याच्या प्रचार कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती सरला  पाटील बोलत होत्या.  यावेळी  प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर पाटील, सरपंच कैलास बाविस्कर, डॉ. सुदाम राठोड, जवाहर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. साळुंखे, नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, सहाय्यक प्रचार अधिकारी विकास तापकीर (नाशिक) उल्हास कोल्हे (जळगाव) आदी उपस्थित होते.
            श्रीमती सरला पाटील म्हणाल्या, माता व बाल आरोग्यासोबतच संपूर्ण गावाच्या आरोग्यासाठी  स्वच्छता खूप महत्वाची आहे.  ग्राम पंचायत आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण  ग्राम स्वच्छतेची शपथ घेतली पाहिजे. 
             डॉ. अर्जुन गुंडे म्हणाले, शासनातर्फे महिला व बाल आरोग्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.  तळागाळातील लोकांच्या दृष्टीने या योजना खूप महत्वाच्या आहेत.  मिशन इंद्रधनुष्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांनी संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. परांग मांदळे यांनी  केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.प्रभाकर पवार यांनी केले. यावेळी ग्रामस्थ व महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले होते.  तसेच  महिलांसाठी सकस आहार, रांगोळी स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा आणि प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात आल्या.  मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.  तत्पूर्वी गावामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.  रॅलीत जवाहर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.  यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय, मोराणेच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय आणि गीत व नाटक विभागाच्या कला पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. 
            या कार्यक्रमास ग्राम पंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, बचत गटाच्या महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. आर. वाणी, डॉ. विजय गौड, डॉ. कुलदीप गजरे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा केदार, ग्रामसेविका मनिषा बाविस्कर,  इम्रान पटेल,  बापू पाटील आरोग्य सेविका श्रीमती व्ही. के. पाठक आदींनी परिश्रम घेतले.                                
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा