मंगळवार, १३ मार्च, २०१२

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवूया - मुख्यमंत्री


मुंबई, दि.12 : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करणे हा मुख्य संकल्प आहे. हा संकल्प पूण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत 2008-09 या वर्षाच्या भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरु स्वच्छ शहर स्पर्धेसाठीचा पारितोषिक वितरण सोहळा आज यशवंतराव चव्हाण केंद्रात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार श्रीमती ॲनी शेखर, पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
            महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी शुभारंभाच्या दिवशी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.
            पाण्याचे व्यवस्थापन शास्त्रोक्तदृष्ट्या करणे हे एक आव्हान असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग होण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणे, सांडपाण्याचा शेतीसाठी वापर करणे आणि त्यातून उद्याने तयार करण्याचे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या अभियानामागील दृष्टीकोनाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या सुजल, निर्मल अभियानात सर्वांनी सहभागी होऊन पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रात अपेक्षित असलेल्या सुधारणा तत्परतेने करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. तसेच पुरस्कार प्राप्त महानगरपालिका व नगरपालिका यांचे अभिनंदन करुन त्यांनी यापुढेही स्वच्छतेच्या दर्जात सातत्य राखावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड, मिरा- भाईंदर महानगरपालिका,
कागल नगरपालिका, बीड नगरपरिषद पुरस्काराने सन्मानित
            पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अ- प्रतवारी मध्ये 35 लक्ष रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आणि कागल नगरपालिकेस (अ प्रतवारी) 30 लक्ष रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र तर गट क्रमांक 2 मध्ये मिरा -भाईंदर महानगरपालिकेस (10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या) अ- प्रतवारी मध्ये 25 लाख रुपये रोख रक्कम,  स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच बीड नगरपरिषदेस (अ- प्रतवारी)गट क्रमांक 3 मध्ये 20 लक्ष रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम आणि अ- प्रतवारी मध्ये गट क्रमांक 4 मध्ये तासगांव नगर परिषदेस (अ- प्रतवारी) 20 लाख रुपये, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  
            जळगांव महानगरपालिका - ब प्रतवारी - 15 लक्ष रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तर पन्हाळा नगरपरिषद - ब प्रतवारी -10 लक्ष रुपये आणि स्मृतीचिन्‍ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक

            नागपूर महानगरपालिकेस पाणी पुरवठा व्यवस्थापनात विशेष उल्लेखनिय कामगिरी बद्दल तर सांडपाणी व्यवस्थापनात विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस पाच लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक.
विशेष प्रमाणपत्र
            सांगली महानगरपालिका-ब प्रतवारीतून अ प्रतवारी प्राप्त, इस्लामपूर व बारामती नगरपरिषद, पंढरपूर, शिरपूर वरवाडे व अंबेजोगाई नगर परिषद-अ प्रतवारी मध्ये सातत्य, चाळीस गांव नगर परिषद, कंधार नगर परिषद-ब प्रतवारी मध्ये सातत्य, वाशिम नगर परिषद, दुधनी नगर परिषद -क प्रतवारी मध्ये सातत्य राखल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
            नागरीकरण झपाट्याने होत असल्यामुळे नागरी सुविधांवर पडणारा ताण कमी करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्व सोयीयुक्त शहरे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, घनकचऱ्याची विल्हेवाट, विजेचा अनावश्यक वापर टाळणे, पाण्याचे स्त्रोत शुद्ध करणे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. तसेच मलकापूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसारख्या उपयुक्त योजना राज्यातील गावागावात राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पाणीपट्टी बिलाची वसूली काटेकोरपणे व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
            आपल्या प्रस्ताविकपर भाषणात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, देशातील 25 हजार निर्मलग्राम गावांपैकी 10 हजार निर्मलग्राम महाराष्ट्रात आहेत. याचा अर्थ लोकांना स्वच्छतेचे महत्व कळले आहे. स्वच्छता हे एक व्रत म्हणून स्वीकारले तर परिणामकारक काम होऊ शकते हे या अभियानाने सिद्ध केले असल्याचे प्रा.ढोबळे यांनी सांगितले.
            या कार्यक्रमास राज्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा