मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

रब्बीच्या क्षेत्रात यंदा भरघोस वाढ होण्याची शक्यता राज्यातील दमदार पावसामुळे टँकर, चारा छावण्यांच्या संख्येत घट

·         ‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे पाणीटंचाईचे सावट दूर
·        स्वयंचलित हवामान केंद्र सुरु करण्याचे आदेश

            मुंबई, दि. 21 :गेल्या काही दिवसात राज्याच्यासर्व भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून टँकर आणि चारा छावण्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यासोबतच जलयुक्त शिवार योजनेतील कामामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. या पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसहसोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगरयेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिक-पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तरआढावा घेतला. त्यावेळी राज्यातील दुष्काळाचे सावट भेडसावणाऱ्या अनेक भागातील चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
            समाधानकारक पावसामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे पाणी साठ आणि सिंचन क्षमतेत झालेल्या वाढीचा आढावा घेण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन झाल्यासत्‍याचा रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे. रब्बीखालील क्षेत्रात मोठी वाढ शक्य असून राज्यात जवळपास 70 लाख हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातील, असा अंदाज आहे. शासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने नियोजन करावे. ज्या जिल्ह्यात रब्बीची पिके घेतली जात नाहीत अशा जिल्ह्यातही रब्बी पीक घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे, तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, या पावसाच्या पहिल्या टप्प्यात पाणी आणि चाऱ्याची स्थिती चांगल्याप्रकारे सुधारली आहे. जायकवाडी प्रकल्पातील साठा सव्वाचार टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जालना जिल्ह्यातील गलाटी धरण प्रथमच 70 टक्के इतके भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टँकरची संख्या 143 वरून 64 इतकी कमी झाली आहे. तर जालना जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा 53 टक्के इतका वाढला असून लघु प्रकल्पातही जलपातळी वाढू लागली आहे.  बीड जिल्ह्याला या पावसाने मोठा दिलासा दिला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पातील साठा साडेतीन टक्क्यांवरून साडेतेरा टक्क्यांपर्यंत तर लोअर दुधना प्रकल्पातील साठा 27 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर गेला आहे. विष्णूपुरी (जि. नांदेड) आणि माजलगाव (जि. बीड) या प्रकल्पातही पातळी वाढू लागली आहे. इतर ठिकाणीही परिस्थितीत मोठा बदल होत आहे. अनेक ठिकाणी गुरांसाठी उघडलेल्या चारा छावण्या बंद होऊ लागल्या असून पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरची संख्याही कमी होत आहे. काही गावात चारा टंचाई असली तरी याच गावांच्या जिल्ह्यात इतरत्र उपलब्ध असणाऱ्या चाऱ्यामुळे बाहेरून चारा मागविण्याची वेळ येणार नाही. अजून परतीचा पाऊस बाकी असल्याने या परिस्थितीत अधिक सुधारणा होईल.
            राज्यात अनेक गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने या पावसामुळे या अभियानाला मोठे यश लाभल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विकेंद्रीत जलसाठ्यामुळे शेतीचा शाश्वत विकास होऊ शकेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यातील जलप्रकल्पांतील पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीचे सावट दूर झाले आहे.
            नवीन जलस्त्रोत निर्माण करण्यापेक्षा जुन्या स्त्रोतांची दुरुस्ती व सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत चांगले काम होईल. तसेच स्वयंचलित हवामान केंद्र लवकर सुरु व्हावीत यासाठी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन मदतीचे वाटप करावे, वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्या शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा