मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

फलोत्पादनाशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक – राज्यपाल


औरंगाबाद,दि. 21 : फळांचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.
            राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेत इस्त्राएलच्या सहकार्याने येथील हिमायत बागेत केशर आंबा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले आहे.  त्याचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झाले.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे होते.  राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.  कृषि व फलोत्पादन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. अतुल सावे, आ. सय्यद इम्तियाज जलील, इस्त्राएलचे कॉन्सिल जनरल डेव्हीड अकोव्ह, कॉन्सिलर डॅन अलूफ, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            हिमायत बागेत या केंद्राचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर व तेथील सुविधांची पाहणी केल्यानंतर  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांना या केंद्राची तसेच केंद्राशी निगडीत बाबींची सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.  यावेळी राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्रात फलोत्पादनाला वाव आहे आणि येथे उत्पादित फळांना मागणीही आहे. फळांची निर्यात करणे शक्य व्हावे यासाठी उत्पादन, हाताळणी आणि वाहतूक या बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणे गरजेचे आहे.  परदेशांनी निर्धारित केलेल्या गुणवत्ता विषयक मापदंडांच्या  कसोटीवर आपले उत्पादन उतरणे आवश्यक आहे, याची माहिती शेतकऱ्यांना दिली जावी आणि त्यादृष्टीने त्यांची क्षमता विकसित केली जावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.  या दिशेने हे केंद्र काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
            राज्यपाल म्हणाले की, फलोत्पादन वाढवतानाच वेगवेगळ्या टप्प्यांवर फळांची काळजी घेणे आवश्यक आहे.  आपल्याकडे बहार आल्यानंतर हाताळणी आणि अन्य बाबतीत काळजी घेतली जात नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाया जाते.  यात सुधारणा होणे तसेच फळे टिकविण्याचे तंत्रज्ञान विकसित होऊन ते उत्पादकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
            आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी दैनंदिन आहारात भाजीपाला आणि फळांच्या उपयोगाचे महत्व नमूद करुन राज्यपालांनी या बाबी ग्राहकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे, असे सांगितले.
            राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील अपुऱ्या पावसाचा आणि खालावत चाललेल्या भूजल पातळीचा उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले की, ही परिस्थिती लक्षात घेता  जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व आहे. राज्य शासनाने हाती घेतलेला जलयुक्त शिवार अभियान हा या दिशेने हाती घेण्यात आलेला एक चांगला उपक्रम आहे.  जलसंधारणाची आवश्यकता लक्षात घेता येती दहा वर्षे राज्यात विविध माध्यमातून जलसंधारणाची कामे व्हावीत. त्यासाठी हे दशक जलसंधारणाचे दशक म्हणून ओळखले जावे. या कालावधीत काळाच्या कसोटीवर टिकलेल्या पारंपारिक उपायांबरोबरच अन्य  उपक्रमांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली जावीत. त्यामुळे  राज्य  आणि देश सुजलाम सुफलाम होऊ शकेल.
            यावेळी विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शेतकऱ्याला वाढते उत्पन्न व्हावे व त्याच्या जीवनमानाचा स्तर वाढावा यासाठी फळबागांचे महत्व असल्याचे सांगितले. पाण्याच्या प्रश्नामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी डाळींबाकडे वळला आहे, असे ते म्हणाले.
            कृषी व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी केशर आंबा गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.  ते विकसित होईल व फलोत्पादक शेतकऱ्यापर्यंत सातत्याने पोहचविले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.  इस्त्राएलचे पाणी व्यवस्थापन महत्वाचे असून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचवावे असेही ते म्हणाले.
            इस्त्राएलचे कॉन्सिल जनरल डेव्हीड अकोव्ह व कॉन्सिलर डॅन अलूफ यांनी या केंद्रातील उपलब्ध तंत्रज्ञान व अन्य बाबींची माहिती दिली.  भारत- इस्त्राएल यांचे परस्पर सहकार्य वाढत असल्याचे सांगून हे केंद्र एक मॉडेल म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  पाणी व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचे शुध्दीकरण करुन त्याचा वापर याबाबतही त्यांनी माहिती दिली.
            या कार्यक्रमात फलोत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी भगवान डोंगरे आणि सूर्यभान कामटे यांनी त्यांचे अनुभव नमूद केले व अपेक्षाही व्यक्त केल्या.
            या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. निधी पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह कृषी, फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा