मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुलींचे शिक्षण महत्त्वाचे -राज्यपाल चे.विद्यासागर राव


औरंगाबाद,दि. 21 : अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी  अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे, असे  प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.चे.विद्यासागर यांनी आज येथे केले.
                अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. सुमारे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 175 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचेअध्यक्ष हरीभाऊ बागडे हे होते.  यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री एकनाथराव खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, कुलगुरु प्रो.बी.ए.चोपडे यांची उपस्थिती होती.
                यावेळी राज्यपाल म्हणाले की, व्यक्तीच्या जडणघडणीत आणि सुसंस्कृत समाजाच्या उभारणीमध्ये शिक्षणाची भूमिका परिणामकारक असून मुलींना विशेषतःग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीमध्ये या समाजातील मुलींची प्रगती हा महत्वाचा टप्पा असून त्यादृष्टीने उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देणारे हे वसतिगृह अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने या विभागाने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नती होण्यात समाजातील सुशिक्षित मुली-स्त्रियांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे,त्यादृष्टीने बदलत्या काळानुसार कौशाल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा,असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
            देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर देश उभारणीसाठी अल्पसंख्याक समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले की, तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील जनतेने दिलेल्या लढ्यात सर्व थरातील लोक सहभागी झाले होते.  राज्यपालांनी शोएब उल्लाखॉन यांच्या कामगिरीचा उल्लेख करुन सांगितले की, त्यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता त्यांची भूमिका मांडली आणि त्यांना त्यांच्या भूमिकेमुळे प्राण द्यावे लागले.  स्वातंत्र्य लढ्यात गणेश शंकर विद्यार्थी आणि शोएब उल्लाखॉन यांच्या सारख्या पत्रकारांनी  बजावलेल्या कामगिरीचे स्मरण सर्वांनी विशेषत: तरुण पिढीतील पत्रकारांनी ठेवावे.
           विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, शिक्षणाने जगण्याचे शहाणपण प्राप्त होत असते.त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे.त्यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळांची  गुणवत्ता वृद्धीगंत करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
          महसूल मंत्री एकनाथराव खडसे यावेळी म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी  विभागामार्फत भरीव प्रयत्न केले जात असून मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी मुलींना 15 हजार रु. शिष्यवृत्ती, मोफत शिक्षणाची संधी,वसतिगृहाची सुविधा यासारख्या विविध उपयुक्त योजना राबविण्यात येत असून उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार,व्यवसाय करण्यासाठी विभागामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  विद्यापीठाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले 175 विद्यार्थिनी क्षमतेचे हे वसतिगृह एक स्तुत्य उपक्रम असून त्याचे रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह असे  नामकरण करण्यात येत असल्याचे महसूल मंत्र्यांनी या वेळी जाहीर केले.
       या कार्यक्रमाला सर्वश्री आमदार सतिश चव्हाण, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलिल, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, कुलसचिव डॉ.महेन्द्र शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,प्राध्यापक,विद्यार्थी,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण कुलगुरु प्रो.चोपडे यांनी केले. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा