गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

दुबार पेरणीची वेळ टळल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांना मदत करणार -महसूल मंत्री एकनाथराव खडसे



             धुळे, दि. 20 :- राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातल्या त्यात मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे.  राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पीक परिस्थिती पाहता, दुबार पेरणीची वेळ टळल्याने रब्बीच्या पेरणीसाठी मदत करण्यात येणार असून  टंचाईवर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
            आज धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, तहसिलदार दत्ता शेजूळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एन, पाटील, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता,  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. एस. सानप व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
            पुढे बोलतांना मंत्री श्री. खडसे म्हणाले, सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने व दुबार पेरणीची वेळ निघून गेली आहे.  त्यामुळे शेतकऱ्याला रब्बीसाठी बियाणे व एकरी 1,500 रूपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कृत्रिम पाऊसाचा प्रयोग 60 टक्के यशस्वी झाला असून त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी योग्य ढगांची  निर्मिती झाल्यास हा प्रयोग 100 टक्के यशस्वी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  लातूर, उस्मानाबाद, बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात चाऱ्याची टंचाई होऊ नये त्‍यासाठी सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध चाऱ्याची नोंद घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता भासेल त्याठिकाणी चारा उपलब्ध करण्यासाठी  शासनामार्फत  ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त  चारा आहे तो खरेदी केला जाईल.
         पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले टँकर लावण्याचे अधिकार  त्या-त्या तालुक्यातील तहसिलदारांना प्रदान करण्यात आले आहेत.  तहसिलदारांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून आवश्यक असेल तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही यादृष्टीकोनातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा.  राज्यात सर्वत्र वैरण विकास कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यासाठी शासनामार्फत मोफत बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. म. गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी कामांचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.                                                                                                       
          दुष्काळी भागातील लहान शेतकरी ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आंत आहे अशा शेतकऱ्यांच्या पाल्यांना सर्व अभ्यासक्रमांच्या  शैक्षणिक फीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले असल्याचेही  यावेळी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी  सांगितले.
            टंचाई सदृश्य तालुक्यांमध्ये कृषि पंपाच्या चालू वीज बिलात 33 टक्के सवलत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शेतसारा माफी अशा सवलतीही लागू केल्या आहेत.  सन 2014-15 या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे शेतकरी या कर्जाचा वार्षिक हप्ता बँकेस वेळेत परत करतील, अशा शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सन 2015-16 या आर्थिक वर्षात शासन माफ करणार आहे.  यापुढील चार वर्षांचे म्हणजेच 2020 पर्यंत होणारे 6 टक्के दराने होणारे व्याज शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित बँकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यासाठी 1 हजार 536 कोटी रूपये शासन खर्च करणार आहे.  यावर्षी 2,883 शेतकऱ्यांचे रूपये 33.49 कोटी पीक कर्जाचे पुनर्गठन बँकांमार्फत करण्यात आले असल्याचे महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            धुळे शहराची हद्दवाढ होणार
            धुळे शहराची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला होता. यासंबंधात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानंतर शासनामार्फत नोटीफिकेशन जारी करण्यात आले असून येत्या काही महिन्यात धुळे शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णयास मान्यता दिला जाणार असल्याचे महसूल मंत्री श्री. खडसे यांनी सांगितले.  
      कृषि विद्यापीठाचे विभाजन करणार
महात्मा फुले राहूरी कृषि विद्यापीठाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
त्यासाठी एका समितीचे गठन करून चाचपणीही करण्यात आली आहे.  खान्देशच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून खान्देशसाठी स्वतंत्र कृषि विद्यापीठ विभाजन करून स्थापन करण्यात येईल.  त्यासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार यापैकी ज्या जिल्ह्यात 4 हजार हेक्टर जमिन उपलब्ध होईल त्या जिल्ह्यात हे  कृषि विद्यापीठ स्थापन केले जाईल, असेही यावेळी मंत्री श्री. खडसे यांनी सांगितले.
       तापी खोरे योजना मार्गी लागणार
         तापी खोरे विकास महामंडळाच्या योजना  अनुशेषामुळे राज्यपालांच्या स्थरावर प्रलंबित असून या योजना तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांच्या समन्वयाने आपण स्वत: प्रयत्नशील आहोत.  लवकरच राज्यपाल याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.   धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील 22 लघुसिंचन योजनाही त्यामुळे पूर्णत्वास येतील अशीही माहिती यावेळी महसूल मंत्री श्री. खडसे यांनी दिली.
         दृष्टीक्षेपात टंचाईवरील उपाय योजना
·        दुबार पेरणीची वेळ टळल्याने रब्बीसाठी एकरी रूपये 1,500 व बियाणे मोफत.
·        कृत्रिम पावसाचा प्रयोग 60 टक्के यशस्वी, ढग जमल्यास 100 टक्के यशस्वी करणार.
·        लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू.
·        सर्व जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची नोंद घेऊन अतिरिक्त चारा खरेदी करणार.
·        पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तहसिलदारांना टँकर लावण्याचे अधिकार बहाल.
·        दुष्काळी भागातील  शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ.
·        शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करणार.
·        शेतकऱ्यांचे 2020 पर्यंतचे 6 टक्के दराने व्याज शासन भरणार. 
·        अल्पमुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर.
00000000

जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची गरज -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


 धुळे, दि. 20 :- जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
आज स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा देतांना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते.  यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,  जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एन. सैंदाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, श्रीमती शुभांगी भारदे, श्रीमती हेमांगी पाटील,  अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. 
प्रतिज्ञा देतांना पुढे जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले, आमच्या मधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व  प्रकारचे मतभेद आपण हिंसाचाराचा व सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा  प्रत्येकाने संकल्प करावा, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले.
दृष्टीक्षेपात सद्भावना दिवस.
·        जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली  सर्वांना सद्भावनेची प्रतिज्ञा.
·        प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली प्रतिज्ञा.
·        मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित.
·        निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले प्रास्ताविक.

000000

अपघातप्रसंगी बचावासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी अधिसूचना जारी

धुळे, दि. 20 :- रस्ते अपघात प्रसंगी किंवा रस्त्याजवळून जाणारा पादचारी अथवा एखादा दक्ष नागरिक अपघातग्रस्त नागरिकांच्या बचावास स्वत:हून पुढे येणारा व अपघातग्रस्तांचा जीव वाचावा अशा प्रामाणिक उद्देशाने मदत करणाऱ्या नागरिकास अपघाताचे तपासासंबंधी तपास यंत्रणेकडून व वैद्यकीय उपचारासंबंधी मदत व्हावी म्हणून संबंधित यंत्रणांकडून अशा नागरिकास नाहक त्रास होऊ नये म्हणून भारत सरकारच्या  12 मे, 2015 रोजीच्या अधिसूचनेत मार्गदर्शक तत्वे प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. 
            रिट पिटीशन क्र. 235/2012 सेव्ह लाईफ फाऊन्डेशनवर इतर विरूध्द भारत सरकार व इतर या न्यायालयीन प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने  29 ऑक्टोबर, 2014 रोजी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र शासनाने सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातामध्ये घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांना अपघातातील वैद्यकीय उपचार तात्काळ मिळावे म्हणून तसेच तपास प्रक्रिये दरम्यान संबंधित यंत्रणाकडून नाहक त्रास होऊ नये म्हणून भारत सरकारने सदर अधिसूचना जारी केलेली आहे.

00000000

फरार बंदीच्या तपासासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

धुळे, दि. 20 :- आझादनगर पोलीस स्टेशनच्या धुळे हद्दीत राहणारा इसम बंदी क्रमांक सी 4380 रमेश रामदास परदेशी रा. म्युनिसीपल शाळा क्रमांक 51/52 मागे शिवाजी नगर, धुळे यास धुळे सत्र न्यायालयाने जन्मठेप, दंड रूपये 500/- न भरल्यास एक महिना शिक्षा हा औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे दि. 16 सप्टेंबर, 1997 पासून संचित रजेवरून अनधिकृतरित्या फरार आहे.  अधिक माहितीसाठी आझाद नगर पोलीस स्टेशन,धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एम. आर. घुणावत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                         
000000

कुंभमेळा कालावधीत मालवाहतूकीचे नियोजन

धुळे, दि. 20 :- सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत शाहीस्नानाच्या दिवशी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने वाहतूक रहदारीचे नियमन करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकरीता वाहतूक वळविण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहे.
राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) (क) तसेच मोटार वाहन कायदा कलम 1988 च्या कलम 115 अन्वये यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
            नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात मालवाहतूक वाहने 27 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 30 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत, 11 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 14 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत, 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 19 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत आणि 24 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 25 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत वळविण्यात येतील.  हे आदेश दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू असणार नाही.

000000

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जगात नावलौकिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नाशिक दि. 19:- सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जगभरात नावलौकिक असून या महापर्वाचे उत्तम आयोजन करण्याचे प्रयत्न शासनामार्फत करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
साधूग्राम येथील प.पू. सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मूर्तडक, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री आम. छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, योगेश घोलप, जयंत जाधव, डॉ. सुधीर तांबे, प्रा. अपूर्व हिरे आदी उपस्थित होते.
          श्री.फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी जगभरातील भाविक, साधू-महंत एकत्र येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविक आणि साधू-महंतांना त्रास होऊ नये यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या . त्यानुसार शासनाने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यात त्रुटी असल्यास साधू-महंतांच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्यात येतील. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येत असून त्याचे श्रेय साधू-महंतांना आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रशासनाने केलेल्या तयारीचीही त्यांनी प्रशंसा केली.  स्थानिक जनतेने आयोजनात चांगले सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देताना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री. शहा म्हणाले, की कुंभमेळा म्हणजे अत्युकृष्‍ट व्यवस्थापनाचे आगळे- वेगळे उदाहरण आहे. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही संशोधनाची मोठी संधी आहे.  शासनाच्या मदतीने विविध आखाडे येणाऱ्या  साधू- संत, महंत आणि भाविकांची उत्तम व्यवस्था करतात. या सोहळ्याचे धार्मिक महत्वदेखील आहे. कुठलेही निमंत्रण नसताना मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात आणि कुंभपर्व यशस्वी करतात. जागतिक स्तरावरदेखील देशातील चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याचा विशेष लौकीक आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. भुसे म्हणाले, की कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाने चांगल्याप्रकारे आर्थिक मदत केली आहे. नाशिककर जनतेच्या सहकार्याने कुंभमेळा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अण्णासाहेब मोरे यांनी कुंभमेळ्यादरम्यान देशाच्या सौख्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल, असे सांगितले. ग्यानदास महाराज यांनी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू- महंतांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे कुंभमेळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे, असे ते म्हणाले.  
श्री. भुजबळ म्हणाले, की कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा नाशिककरांना लाभ होईल. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करीत त्यांना ‘अतिथी देवो भव’ चा अनुभव मिळवून द्या, असे  आवाहन त्यांनी केले. महापौर मूर्तडक यांनी प्रास्ताविक केले.
 कार्यक्रमाला स्वामी समर्थ पीठाचे अण्णासाहेब मोरे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज, नरेंद्राचार्य महाराज, वल्लभाचार्य महाराज, रामानंदाचार्य महाराज, हंसानंदाचार्य महाराज, माधवाचार्य महाराज, धर्मदास महाराज, राजेंद्रदास महाराज, संजयदास महाराज, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह साधू- महंत, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पंडित उपेंद्र भट, मीना परुळेकर यांनी अभंगवाणी सादर केली, तर नाशिकच्या ढोल पथकाने प्रात्यक्षिके दाखविली.        मान्यवरांच्या हस्ते दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा आणि निर्वाणी आखाड्यांचे ध्वजारोहण करण्यात आले.
          ***************        

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

सहा जिल्ह्यांत राबविणार पथदर्शी उपक्रम ‘आपले सरकार’च्या दुसऱ्या टप्प्याचा आज प्रारंभ

मुंबई, दि. 14 : जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ उद्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
            जनतेला ऑनलाईन सेवा देण्याच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. आता ही सेवा जिल्हास्तरावर विस्तारण्यात येणार आहे. पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा उपक्रम सुरुवातीला सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पोर्टलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, नगरपालिका, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदांसंदर्भातील अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प 30 जिल्ह्यांत सुरू करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्पात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करुन अंतिमत: परिपूर्ण पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल.
            या उपक्रमाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2015 रोजी जनतेसाठी सुरू करण्यात आला होता. नागरिकांकडून मंत्रालय स्तरावरील 9 हजार 200 तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी 78 टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. पोर्टलवर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निपटाऱ्याचे प्रमाण 84.5 टक्के इतके लक्षणीय आहे. निपटारा न झालेल्या आणि गुंतागुंतीच्या तक्रारी मासिक ई-लोकशाही बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वत: सोडविणार आहेत.
            नागरिकांना घरबसल्या शासनाच्या सेवा मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून देण्यासाठी आपले सरकार’ या पोर्टलचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोर्टलच्या माध्यमातून आपल्या तक्रारी शासनाकडे मांडण्यासाठी किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबधी जनतेला सूचना-अभिप्राय देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या तक्रारींचे 21 दिवसात निराकरण केले जाते. सुशासनासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जनतेला घरपोच सेवा देण्यात येत आहेत. या पोर्टलवर तक्रारी, अर्ज, माहिती अधिकार आणि प्रतिसाद या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

-----०००-----