मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

भारत लवकरच पोलिओ मुक्त होईल - राज्यपाल


मुंबई, दि. 18 : भारत  देश  लवकरच  पोलिओ मुक्त होईल, अशी आशा राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज येथे व्यक्त केली.
          आदित्य बिर्ला ग्रुप, रोटरी इंटरनॅशनल आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिओ निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालक राजश्री बिर्ला, रोटरी इंटरनॅशनलचे संचालक अशोक महाजन तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          राज्यपाल पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात भारतात कुठेही पोलिओचा रुग्ण आढळला नाही. पोलिओ निर्मूलनासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि स्वयंसेवी संस्थां एकत्रित प्रयत्न करत असल्यामुळे हे शक्य झाले आहे. देशात पोलिओ निर्मुलनाचे काम उत्तम प्रकारे सुरु असून लवकरच भारताला पोलिओ मुक्त देश म्हणून अधिकृतपणे घोषित  करण्यात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली .
          आदित्य बिर्ला ग्रुप पोलिओ निर्मुलनाच्या कामात महत्वपूर्ण योगदान देत आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, मल्टी ड्रग रेझीस्टंट क्षय रोगामुळे मुंबईच्या दाट लोकवस्तीत भिती पसरली होती, पोलिओ प्रमाणेच क्षय आणि इतर संसर्गजन्य रोगांवर देखील विजय मिळविणे गरजेचे आहे. हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी बिर्ला ग्रुप तसेच रोटरी इंटरनॅशनल या सारख्या संस्थांनी लक्ष द्यावे असे, आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा