मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

संपात सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

मुंबई, दि. 1 :  अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दि. 2 सप्टेंबर 2015 रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करणार आहे. या संपात सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
          महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला संप बेकायदेशीर ठरतो. केंद्र शासनाचे काम नाही, वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने दि. 29 ऑगस्ट 2015 रोजी परिपत्रकही निर्गमित केले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (साविस) प्रमोद नलावडे यांनी कळवली आहे.

          राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा