सोमवार, ५ मार्च, २०१२

व्यवसाय वाढीसाठी आव्हानांचा सामना करतांना नाविन्याचा शोध घेणे गरजेचे -- जयंत पाटील


मुंबई दि. 3:  व्यवसाय वाढीसाठी आव्हानांचा सामना करताना नाविन्याचा शोध घेणेही गरजेचे असते असे मत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही उद्योगिनी पुरस्कारांचे वितरण श्री. पाटील यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमईडीसीचे अध्यक्ष विठ्ठल कामत, आम्ही उद्योगिनी या संस्थेच्या संस्थापक मीनल मोहाडीकर, बँका तसेच उद्योग क्षेत्रातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
दुसऱ्याने उडी टाकल्यानंतर तो बुडला नाही, तरंगून वर आला तर आपण उडी मारायची अशी वृत्ती उद्योग -व्यवसायासाठी ठीक नाही. व्यवसाय सुरु करतांना येणाऱ्या नवीन आव्हानांचा विचार करून त्याला सामोरे जाण्याची क्षमता आपल्यात विकसित केली पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. आपण आव्हान स्वीकारायला घाबरतो. त्याचे मुळ आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे असे मला वाटते असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक चौकट अधिक व्यापक करतांना विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचे शिक्षण देण्याचीही गरज आहे असेही ते म्हणाले.
उद्योग-व्यवसाय सुरु केला की त्याचे चांगले पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग झाले पाहिजे तर तो ब्रॅण्ड विकसित करायला आपल्याला वेळ मिळतो असे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले की, राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत सुमारे 2 लाख 60 हजार बचतगट स्थापन झाले आहेत. या बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंच्या आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग साठी विभागाने तज्ज्ञ बाजारपेठ मार्गदर्शक संस्थेची नियुक्ती करण्याचे ठरवले असून त्यामुळे बचतगटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ व योग्य भाव मिळू शकेल अशी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.
उद्योग- व्यवसाय करताना बाजारपेठेत कोणत्या उत्पादनांचा अभाव किंवा रिक्तता आहे हे लक्षात घेऊन म्हणजे तो गॅप ओळखून आपण कोणते उत्पादन तयार केले पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे उद्योगाचे मॅपिंग केले पाहिजे आणि नंतर ते उत्पादन बाजारपेठेत आणून ती बाजारपेठ टॅप अर्थात काबीज केली पाहिजे असे यशस्वी उद्योगाचे मर्म स्पष्ट करताना विठ्ठल कामत यांनी उत्पादनांच्या ब्रॅण्डिंगचे महत्त्व उपस्थित महिलांना समजावून सांगितले.
श्रीमती मीनल मोहाडीकर यांनी यावेळी आम्ही उद्योगिनी या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि यानिमित्ताने आज पार पडलेल्या राज्यव्यापी उद्योजकांच्या महिला परिषदेचे अनुभव आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही उद्योगिनी या संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या उद्यमशील महिलांच्या मुखपत्राचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा