मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

महाराजस्व अभियानातून वंचितांचे ‘समाधान’ करण्याची संवेदनशिलता दाखवावी - जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 25 :- महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतीमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्यात गेल्या चार वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.  सदर अभियानात काही नवीन लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून महाराजस्व हे महत्वाकांक्षी अभियान 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.  या महाराजस्व अभियानाच्या विस्तारीत समाधान योजनेतून जिल्ह्यातील शेवटच्या वंचित घटकांचे समाधान करण्याची संवेदनशिलता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात  महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना राबविण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे,  समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे,  जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. पी. वाघ, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे उप कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे,  उप विभागीय अधिकारी राहूल पाटील (शिरपूर) जे. आर. वळवी (धुळे), तहसिलदार दत्ता शेजूळ (धुळे) नितीन पाटील (शिरपूर), माणिक आहेर  (साक्री), पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, विस्तारीत समाधान योजनेअंतर्गत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट दिवशी ग्राम, मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे संकल्पित आहे.  या विस्तारित समाधान योजनेंतर्गत शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम, मंडळ स्तरावर महिन्यातून एका विशिष्ट पूर्व नियोजित दिवशी एकत्र यावे व जनतेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष देण्याची कार्यवाही करावी.  त्यासाठी या विस्तारीत समाधान योजनेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी करून त्यामध्ये सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय  विभागांना योग्य प्रकारे सामावून घ्यावे व त्यास व्यापक पूर्वप्रसिध्दी द्यावी.  प्रत्यक्षात कार्यक्रमांचे आयोजन लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरिता विविध स्वरूपाच्या दाखल्यांची आवश्यकता असते.  यासंबंधी प्रक्रिया सुकर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांकरिता सहामाही, वार्षिक परिक्षेच्या पूर्वी व सुटीच्या दिवशी तसेच सर्वसाधारण जनतेस आवश्यक दाखल्यांसाठी जनतेच्या सोयीच्या मध्यवर्ती अशा मंडळ स्तरावर  शिबिरे आयोजित करून त्याठिकाणी दाखल्यांकरिता आवश्यक ते अर्ज व कागदपत्रे याबाबत जनतेस माहिती व त्याच ठिकाणी अर्ज भरून घेऊन विविध दाखले निर्गमित करण्यात यावेत, असे सांगून   जिल्हाधिकारी म्हणाले, यासाठी  प्रथम तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची तसेच अन्य वाटप केंद्रांची संख्या निर्धारित करण्यात यावी, त्यानंतर तेथे घ्याव्याच्या दाखले वाटप शिबीरांच्या तारखा निश्चित करण्यात याव्यात व त्यास व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी, शिबिरासाठी निश्चित केलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना विविध प्रमाणपत्रांकरिता आवश्यक असलेले अर्जाचे छापीन नमुने व आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांची यादी पुरविण्यात यावी.  जेणेकरून शिबीराच्या दिवशी परिपूर्ण विहीत नमुन्यात भरलेले अर्ज विद्यार्थ्यांकडून प्राप्त करून घेता येतील, शिबीराच्या दिवशी आवश्यक असलेला सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग शिबीरास उपस्थित राहील हे सुनिश्चित करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यास, अर्जदारास त्याच दिवशी  प्रमाणपत्रे, दाखले पुरविता येतील अशी कार्यपध्दती अवलंबवावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
  यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजनेद्वारे शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम व मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय जिल्ह्यात एकूण 39 शिबिरांचे ऑगस्ट 2015 ते  जून 2016 पर्यंत  नियोजन करण्यात आले आहे.  त्यात धुळे तालुक्यात-12, साक्री तालुक्यात-10, शिरपूर तालुक्यात-7, शिंदखेडा तालुक्यात 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे.  तालुकानिहाय व गांवनिहाय  तारखा पुढीलप्रमाणे आहेत. 
धुळे तालुका- लामकानी येथे 19 ऑगस्ट रोजी शिबिर झाले असून आर्वी (16 सप्टेंबर,2015), बोरकुंड (21 ऑक्टोंबर,2015),शिरूड (18नोव्हेंबर,2015), मुकटी (16 डिसेंबर,2015), फागणे (20 जानेवारी, 2016), नगांव (16 फेब्रुवारी, 2016), सोनगीर (17 मार्च, 2016), नेर (21 एप्रिल, 2016), कुसुंबा (19 मे, 2016), धुळे शहर (21 जुलै, 2016).
साक्री  तालुका- पिंपळपाडा येथे 15 ऑगस्ट 2015 रोजी शिबिर संपन्न झाले असून मालगांव (8 सप्टेंबर, 2015), ब्राम्हणवेल (20 ऑक्टोबर, 2015), शेणपूर (17 नोव्हेंबर, 2015), मैंदाणे (8 डिसेंबर, 2015), साक्री (12 जानेवारी, 2016), निजामपूर (9 फेब्रुवारी, 2016), दुसाणे ( 8 मार्च, 2016), कुडाशी (12 एप्रिल, 2016), म्हसदी प्र. नेर (10 ऑक्टोबर, 2016).
शिरपूर तालुका- शिरपूर (12 सप्टेंबर,2015), सांगवी (10 ऑक्टोबर, 2015), बोराडी (14 नोव्हेंबर,2015), अर्थे (12 डिसेंबर, 2015), जवखेडा (9 जानेवारी, 2016), होळनांथे (13 फेब्रुवारी, 2016), थाळनेर (12 मार्च, 2016)
शिंदखेडा तालुका- शिंदखेडा (26 ऑगस्ट, 2015), चिमठाणे (23 सप्टेंबर, 2015),शेवाडे (28 ऑक्टोबर, 2015 व 22 जून, 2016), वर्षी (25 नोव्हेंबर, 2015), खलाणे (23 डिसेंबर, 2015), नरडाणा (27 जानेवारी, 2016), बेटावद (24 फेब्रुवारी, 2016 व 27 जुलै, 2016), विरदेल (23 मार्च, 2016), विखरण (27 एप्रिल, 2016), दोंडाईचा (25 मे, 2016)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा