मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत धान्य हमी योजना राबविण्यास मान्यता


घरपोच धान्य योजनेच्या यशस्वी अनुभवाच्या आधारे राज्यातील सर्व जिल्ह्यात तसेच मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात धान्य वितरणाची सुधारित प्रणाली-धान्य हमी योजना राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
        सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिधापत्रिका धारकांना योग्य दर्जाचे निर्धारित भावात अन्नधान्य खात्रीशीररित्या उपलब्ध होईल याची हमी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
            या योजनेंतर्गत एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य (गहू तांदूळदारिद्रयरेषेखालील (BPL) अंत्योदय अन्न योजना (AAY) या योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
            धान्य वितरणाची ही सुधारित प्रणाली ऐच्छिक असून त्यासाठी बी.पी.एल अंत्योदय अन्न योजनेच्या किमान 60 टक्के शिधापत्रिकाधारकांनी तहसीलदार/ शिधावाटप अधिकारी  यांच्याकडे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्याकरिता लेखी मागणी करणे आवश्यक आहे. इच्छूक शिधापत्रिकाधारकांनी त्यांना पुढील 3 महिन्यात आवश्यक असलेल्या धान्याची एकत्रित रक्कम महिन्याच्या 20 तारखेपर्यंत  रास्तभाव दुकानदाराकडे जमा करणे आवश्यक राहील, जेणेकरुन पुढील महिन्याच्या 6 तारखेपर्यंत धान्य वाहतूक करुन ते पुढील अन्नदिनाच्या दिवशी गावात वाटपासाठी उपलब्ध करुन देणे शक्य होईल.
            एपीएल अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थ्यांना तसेच वरील योजनेत सहभागी होणाऱ्या बी.पी.एल. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य, साखर, केरोसिन पामतेल या शिधावस्तूंचे वितरण रास्त भाव / शिधावाटप दुकानातून पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे.
            वरीलप्रमाणे संपूर्ण राज्यात धान्य वितरणाच्या सुधारित प्रणाली अंतर्गत प्रत्येक महिन्यातील दिनांक 7 हा दिवस "अन्न दिवस" (Food Day) राहील. या दिवशी  जाहीर पध्दतीने रास्त भाव दुकान/चावडी/इतर सार्वजनिक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येईल. धान्याचे वितरण शासन प्रतिनिधी/ दक्षता समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात येईल धान्य वाटपाचा अहवाल तहसिलदार/ शिधावाटप अधिकारी यांचेकडे पाठविण्यात येईल.        
                                                                  -- --00----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा