मंगळवार, ३० जून, २०१५

राज्याच्या विकासासाठी मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 वेळेत पूर्ण करणार -मुख्यमंत्री

मुंबई दि. 28- राज्याचा जलद गतीने विकास होण्यासाठी आवश्यक असणारा मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) हा महत्वाकांक्षी प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीया प्रकल्पाच्या शुभारंभाप्रसंगी केले.
          येथील सहयाद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत जयगड पोर्ट जोडण्यासाठीJSW आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. यांच्यामध्ये सवलत करारावर हस्ताक्षर तसेच मध्य रेल्वे आणि राज्य सरकारच्या एस.पी.व्हीसाठी सामंजस्य करारावर हस्ताक्षर करण्यात आले त्याचबरोबर मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन  (MRVC) मध्येई -ऑफिसचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) या महत्वाकांक्षी प्रकल्पाची किंमत 11 हजार 440 कोटी रुपये इतकी आहे.
               यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार सर्वश्री. रामदास आठवले, राजन विचारे, अरविंद सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मंगलप्रभात लोढा, मंदाताई म्हात्रे,  परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव गौतम चटर्जी, जेएसडब्लूचे प्रमुख सज्जन जिंदाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सुद यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.             याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, 11 हजार 440 कोटींचा मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 ची सुरुवात महत्वपूर्ण आहे. राज्यातील मागास भागास रेल्वे मार्गाने जोडण्यात आल्यास त्या भागाचा विकास होण्यास मदत होते. यासाठी हा प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील अपूर्ण असलेले रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणे आणि प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येतील.या प्रकल्पामुळे विविध बंदरे, रेल्वे आणि मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार आहे. तसेच बंदरांची क्षमता वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. संपूर्ण परिवहन व्यवस्थेचे एकत्रीकरण करणे इतकेच नव्हे तर सिंगल टिकीटिंग मॉडेल आणण्याचाही विचार आहे.
      यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, राज्य आणि केंद्र एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, पुढची दिशा ठरविण्यासाठी हे करार अत्यंत महत्वाचे आहेत. मुंबईत देशभरातुन प्रवाशी  रेल्वेने येतात. त्याचबरोबर 75 लाख प्रवाशीदररोज लोकलचा प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेचा विकास देशाचा विकास आहे. तर डिजिटल इंडिया होण्यासाठी,ई -ऑफिसचा शुभारंभमहत्वपूर्ण  आहे.
        यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई व महाराष्ट्राकरीता असलेल्या रेल्वे प्रकल्पांची तसेच प्रलंबित प्रकल्पांची माहिती दिली तर खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेसंबंधी समस्यांबाबत तसेच आपत्ती काळात महिलांसाठी  महिला डब्यांमध्ये टॉयलेटची व्यवस्था असण्याची सुचना मांडली.
सिंहस्थ कुंभमेळयासाठी नाशिक शहरात मोठया प्रमाणात भाविक येणार असून येणाऱ्या भविकांची गर्दी लक्षात घेऊन महापर्वणीच्या अगोदर दोन ते तीन दिवस भाविक शहरात दाखल होतात. महापर्वणीचे स्नान झाल्यानंतर सर्वाना परत जायचे असते ही बाब लक्षात घेऊन एकाच वेळी दोन ते तीन लाख भविकांच्या परतीच्या प्रवासाचा आराखडा रेल्वे विभागाने तयार केला आहे.  प्रवाशांच्या सोई-सुविधेसाठी दर वीस मिनिटांनी रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत माहिती देणारे होर्डिंग्स, वेळोवेळी उद्घोषणा ही करण्यात येणार आहे. तसेच याकाळात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई शहर परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार- डहाणू 126 कि.मी-2 हजार 555 कोटी रुपये,पनवेल-कर्जत ही नवीन उपनगरीय मार्गीका जोडण्यात येणार असून त्याची लांबी 56 कि.मी. असणार आहे. या प्रकल्पाची किंमत 2 हजार 24कोटी रुपये आहे. त्याचबरोबर ऐरोली आणि मध्य रेल्वे मार्गावरील कळवा यादरम्यान 8 कि.मी. नवीन उपनगरीय मार्गीका जोडण्यात येणार आहे. या प्रकलपाची किमत 428कोटी रुपये आहे. याशिवाय रोलींग स्टॉकसाठी 565 युनिट लागणार असून यासाठी 2 हजार 899  कोटी रुपये, तर पश्चिम (11), मध्य ( 8) आणि हार्बर (2) या तीन्ही रेल्वे मार्गावरील 21 स्थनाकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.यासाठी 1 हजार 950 कोटी रुपये खर्च येणार आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील ट्रेसपास कंट्रोलसाठी 22 मध्य विभाग असून यासाठी 520 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बंदरांचा विकास करण्याला प्राधान्य राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पाचा सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कोकण रेल्वे महामंडळाने जयगड बंदर ते डिगणी (संगमेश्वर) हा जोड रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जयगड ते डिगणी हा 33.7 कि.मी. चा हा नवीन रेल्वे  मार्ग असेल.

 या प्रस्तावित एकेरी मार्गाचा खर्च 771कोटी रूपये आहे. हा प्रकल्प कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड आणि जयगड पोर्ट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सुमारे 30 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा